नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच व्यापक फेरबदलही केले. त्यानुसार, 12 मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांचाही समावेश आहे. करोना संकट हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा ठपका विरोधकांकडून ठेवला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, वर्धन यांची उचलबांगडी मोठ्या चर्चेचा विषय ठरणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी 12 मंत्र्यांनी दिलेले राजीनामे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये वर्धन यांच्याबरोबरच रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल निशंक, डी.व्ही.सदानंद गौडा आणि थावरचंद गेहलोत या सहा कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.
स्वतंत्र कार्यभार सांभाळणारे राज्यमंत्री संतोष गंगवार हेही मंत्रिपदावरून पायउतार झाले. त्याशिवाय, बाबुल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया, देवश्री चौधरी आणि प्रतापचंद्र सारंगी या पाच राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिले.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसाद यांचा राजीनामा चकित करणारा ठरला आहे. नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून सरकार आणि ट्विटरमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. कायदा आणि माहिती-तंत्रज्ञान हे विभाग सांभाळणाऱ्या प्रसाद यांच्या राजीनाम्याला ती पार्श्वभूमीही आहे.
शिक्षण मंत्री पोखरियाल यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे समजते. तर, गेहलोत यांची याआधीच कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.