नवी दिल्ली – देशांत पुन्हा एकदा करोनाची लाट पसरत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम बेरोजगारी निर्माण होण्यात होत असल्याचे एका संस्थेच्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
बेरोजगारीचा दर 11 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात 8.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. दोन आठवड्यापुर्वी तो 6.7 टक्क्यांवर होता. ही माहिती सेंटर फॉर मॉनेटरिंग इंडियन इकॉनॉमी प्रा. लि. ने दिलेल्या अहवालात स्पष्ट झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच कडक निर्बंध लादले जातील, या भीतीने 10 टक्के लोकांनी आपल्या मूळगावी जाणे पसंत केल्याचे चित्र असल्याने त्याचा फटका सर्वाधिक शहरी भागाला बसला असून तेथे बेरोजगारीचे प्रमाण 10 टक्क्यांवर पोहोचले आहे.
दिवसांत सुमारे एक लाख 68 हजार बाधित वाढल्याने आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या या देशाने एकूण बाधितांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे रुग्णालये बाधितांनी ओसंडून वाहात असल्याने राज्यांना निर्बंध लादणे क्रमप्राप्त होत आहे.
या विषाणूचा सर्वाधिक फटका महराष्ट्राला बसला असून त्यामुळे कडक वीकेन्ड लॉकडाऊनसारख्या उपाययोजना राबवाव्या लागल्या. दिल्लीत रात्रीची संचारबंदी लागू केली असून वैद्यकीय परिस्थिती ढासळल्यास आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरित आपली नोकरी सोडून गावी परतले. पुरेसे पाणी आणि अन्न नसतानाही ते मैलोन्मैल चालत राहिले. मात्र, संसर्ग आश्चर्यकारकरित्या घटल्यानंतर अर्थव्यवस्था काहीशी सुरळीत झाल्यानंतर रोजगाराच्या काही संधी निर्माण झाल्या होत्या.
गेल्या महिन्यात करोनाचा संसर्ग सप्टेंबर 2020 नंतर अचानक वाढायला लागला. त्यामुळे त्याचा फटका रोजगाराच्या संधीवर झाला, असे आयएचएस मार्केटने उत्पादकांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
दीर्घकाळ आणि वेगाने पसरणारी रात्रीची संचारबंदी पुन्हा एकदा उलट्या स्थलांतराची लाट निर्माण करू शकते. त्यामुळे रोजगारनिर्मिती हे एक आव्हान बनेल.
कुणाल कुंडू
अर्थशास्त्रज्ञ, बंगळुरू