जेव्हा आपण वैयक्तिकरित्या “मी’ किंवा सामूहिकरित्या “आम्ही’ म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीस, त्या गटास एक स्वतंत्र अस्तित्व असते. ते अस्तित्व निर्माण होते ते त्या व्यक्तीच्या, समूहाच्या स्वतःच्या आचार विचाराने. आधुनिक काळात प्रत्येक व्यक्तीच्या अस्तित्वासाठी “स्वातंत्र्य’ फार गरजेचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्याची सोपी व्याख्या म्हणजे स्वतःचे तंत्र. स्वतःच्या तंत्राने, स्वतःच्या पध्दतीने जगणे. हे स्वतःच्या तंत्राने जगणे व्यक्तीसाठी जेवढे महत्वाचे असते तेवढेच ते प्रत्येक देशासाठीही आवश्यक असते.
भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावे आज प्रत्येक भारतीयाला माहीत आहेत. जगाच्या नकाशात आपल्या देशाची एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख आहे आणि भारतीय म्हणून आपली ओळख आहे. ही ओळख केवळ आधारकार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्राएवढीच मर्यादित नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगाच्या इतिहासात हजारो वर्षांपासून आपल्या देशाचे अस्तित्व आहे. असे असले तरी आज आपला देश 75 वर्षांचा झाला आहे. कारण गेली पंच्याहत्तर वर्षे “भारत’ एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. ब्रिटिशांच्या अधिपत्यातून स्वतंत्र होताना आपल्याला स्वतंत्र राष्ट्र होताना राज्यघटना स्वीकारणे आवश्यक होते.
जगाच्या नकाशात, आंतरराष्ट्रीय राजकारणात “भारत’ नावाचा आपला देश अस्तित्वात आहे. ते अस्तित्व आपल्याला आपल्या संविधानामुळे आहे. संविधान म्हणजे आपली “राज्य घटना.’ संविधानास आपण मराठीत राज्यघटना म्हणतो तर इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन. आज आपल्याला केवळ या तीन शब्दांपुरातीच आपल्या घटना माहीत आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. म्हणूनच आज भारत म्हणजे 75 वर्षांचे लोकशाही राष्ट्र म्हणून देशाचे स्वातंत्र्य जगताना, आपले वैयक्तिक स्वातंत्र्य उपभोगताना आपल्याला आपले संविधान किती कळले आहे? आपल्याला आपले संविधान, त्यातील तरतुदी कितपत माहीत आहेत? हा प्रश्न आज आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आजपासून आपल्याला आपले संविधान जाणून घेण्याचा प्रवास सुरु करायचा आहे. आज प्रत्येक भारतीय नागरिकाचा “आम जनता’, “सामान्य लोक’ यातून बाहेर पडून सक्षम नागरिक बनविण्याचा प्रवास सुरु करणे ही काळाची गरज आहे. या प्रवासाची सुरुवात करताना आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारायचे आहेत. देशाचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय? स्वातंत्र्य या शब्दाचा नेमका अर्थ काय? आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमकं काय मिळाले?
स्वातंत्र्य ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी अबाधित राखता येते? लोकशाही म्हणजे काय? ती कशी कार्यरत असते? सक्षम लोकशाहीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? कायद्याचे राज्य म्हणजे काय? लोकशाही देशात कायद्याचे राज्य असण्याची गरज काय? हे कायद्याचे राज्य कसे असावे? लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय? ते कसे कार्य करते? कायदेमंडळ कसे स्थापन होते? कायदेमंडळाचे काम कसे चालते? देशाचा सर्वोच्च कायदा कोणता?
तो कसा असायला हवा? या सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या नागरिकाला देता येतील तो या देशाचा सजग आणि सक्षम नागरिक असणार आहे. इतिहासात हजारो वर्षांपासून सर्व राजवटीमध्ये क्वचितच जनतेच्या स्वातंत्र्याचा, हिताचा, लोकशाहीचा विचार केलेला दिसतो. जनतेला स्थान दिलेले दिसते. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला मिळालेले स्वातंत्र्य खूप मोलाचे आहे. कारण ते देशाला आणि देशातील प्रत्येक जनतेला मिळाले आहे. राज्यकारभार करताना स्वातंत्र्य केवळ राज्यकर्त्यांनाच असून चालत नाही तर ते प्रत्येक नागरिकाला असायला हवे. जेव्हा नागरिकांना विचार, आचार, निर्णय स्वातंत्र्य असते तेव्हाच कोणत्याही देशात लोकशाही आणि कल्याणकारी राज्य या संकल्पनेची अधिक चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होते.
कायद्याचे राज्य या संकल्पनेशिवाय कोणतीही लोकशाही परिपूर्ण होऊच शकत नाही. आपली राज्य घटना ही जगातील सर्वात मोठी राज्य घटना असून ती एक परिपूर्ण घटना मानली जाते. त्यामुळे भारतीय राज्य घटना आणि कायद्याचे राज्य हे भारतीय लोकशाहीची आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्याची महत्वाची बाजू आहे. भारतीय स्वातंत्र्याचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय राज्य घटना ही आत्मा आहे. लोकांनी लोकांसाठी दिलेला अमूल्य ठेवा असून जोपर्यंत हा ठेवा अबाधित राहणार आहे तोपर्यंत आपले स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे.
आपले संविधान म्हणजे केवळ राज्यकारभार कसा चालवा याची नियमावली नाही. स्वातंत्र्य म्हणजे केवळ जोखडातून, बंधनातून मुक्ती एवढाच मर्यादित अर्थ नसून स्वातंत्र्य म्हणजे हक्क आणि कर्तव्य यांचा संगम आहे. आपले संविधान खऱ्या अर्थाने समजून घेऊ तेव्हाच संविधान मुल्यांचा अंगीकार करू. जन्म घेतो, त्या देशात जन्माने आपण त्या देशाचे कागदोपत्री नागरिक बनतो. पण खऱ्या अर्थाने नागरिक बनण्यासाठी आपले संविधान समजून घेणे. त्यातील मूल्य आपल्यात अंगिकारणे गरजेचे आहे. तेव्हा चला आपण आपले संविधान जाणून घेऊन घराघरात संविधान पोहचवूया.