पुणे – उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असल्याने तसेच यंदा पावसाळ्यात कमी पावसाचा अंदाज असल्याने शहरात “पाणीबाणी’ची स्थिती उद्भवू नये यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठा तसेच शहराच्या पाणी नियोजनावर आज महापालिकेत बैठक होणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
खडकवासला धरणात आज अखेर 16. 85 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी जवळपास मागील वर्षा इतकेच आहे. तर, दरवर्षी उशीरा सुरू होणारा पाऊस तसेच धरणात पाणीसाठण्यास लागणारा वेळ ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून 30 जुलैपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी केली जाणार असून पालिकेस जुलै अखेर पर्यंत सुमारे 7 ते 9 टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे.महापालिकेने काटकसर अथवा एक वेळ कपात करून पाणी दिल्यास पालिकेस पाच ते सहाच टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. मात्र हवामानाचे अंदाज पाहता पुढीलवर्षी पाऊस कमी होण्याच्या भीतीने महापालिका आतापासूनच तयारीला लागली आहे.
उन्हाळा अधिक “तापदायक’…
धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात कालवा समितीची बैठक होते. मात्र, यंदा अद्यापही ही बैठक झालेली नाही त्यातच, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च अखेरपर्यंत चालणार असल्याने ही बैठक होण्याबाबत साशंकता आहे. परिणामी, “तापदायक’ उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनेच बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे. यंदा मार्च मध्येच उन्हाची तिव्रता वाढली असून एप्रील, मे मध्ये उन्हाचा चटका आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हामुळे धरणातील पाण्याचे मोठे बाष्पीभवन होते. पुण्यात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही वर्षात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरूवात होते. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक होत असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले.
गतवर्षी करावी लागली कपात…
पावसाने ओढ दिल्याने महापालिकेस गतवर्षी जून महिन्यांत पाणी कपात करण्याची वेळ आली होती. त्यानुसार, पालिकेकडून शहरात आठ दिवस एकवेळ पाणी देण्यात आले. त्यानंतर दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्याच वेळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात होऊन जवळपास सात टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे महापालिकेने नंतर कपात मागे घेतली. तर जुलैपासून सुरू झालेला पाऊस नंतर जवळपास ऑक्टोबर पर्यंत सुरू राहिला. त्यामुळे सुमारे 30 टीएमसी साठवण क्षमता असलेली खडकवासला धरण साखळी मधील पानशेत, वरसगाव, टेमघर तसेच खडकवासला ही 4 धरणे 100 टक्के भरली. तर, सुमारे 24 टीएमसी पाणी मुठा नदीतून सोडण्यात आले. त्यामुळे यावर्षी असे पाणी साठविता येईल का, याबाबतही चर्चा अपेक्षित आहे.