कोडोली – सातारा शहरानजीक कोडोली गावाला लागून असणाऱ्या सातारा ते रहिमतपूर रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा पडत चालला आहे. सातारा शहराकडून जाणारा रहिमतपूर रस्त्यावर देगाव फाटा, कोडोली या ठिकाणी रस्त्यावर टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पदपथच राहिला नाही. या पदपथावरील अतिक्रमणे तातडीने दूर करुन रस्ता नागरिकांना चालण्यासाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, सध्या सातारा ते रहिमतपूर रस्ता चांगला डांबरीकरण झाला असून तो मोठाही झाला आहे. रस्ता चांगला झाल्याने वाहनांना गती आली असून यामुळे देगाव फाटा परिसरात छोटे मोठे अपघात दररोज घडत असतात. त्यातच आता नागरिकांसाठी असलेल्या पदपथासह काही ठिकाणी चक्क रस्त्यावरच काही विक्रेत्यांनी टपऱ्या टाकून अतिक्रमण केले आहे. तर अनेक भाजी विक्रेते, कपडे विक्री करणारे देखील पदपथ व रस्त्यावर ठाण मांडून वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. वाहनांची वाढलेली गती आणि रस्त्याच्या कडेला होणारी अतिक्रमणे यामुळे रस्ता ओलांडून जात असताना अनेक अपघात घडत आहेत. पाठीमागील महिन्यात एका अपघातात एकाचा जीवही गेला आहे.
या परिसरातील कोडोली, धनगरवाडी, समर्थनगर, संभाजीनगर ग्रामपंचायती आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही या अतिक्रमणे करणारांवर होत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी सर्व अतिक्रमणे हटवली होती. मात्र नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे चार ते पाच दिवसात पुन्हा सर्व दुकाने आहे तशी सुरु आहेत. आता पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाने धडक कारवाई करुन अतिक्रमणे हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.