मॅंचेस्टर -इंग्लंड व भारत यांच्यातील पाच कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सपोर्ट स्टाफमधील आणखी एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे समोर आल्यामुळे संघाचे सराव सत्रही रद्द करण्यात आले आहे. तसेच आता खेळाडूंच्या सुरक्षेला तसेच यानंतर होत असलेल्या आयपीएल स्पर्धेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगतिले जात असून पाचवा कसोटी सामना त्यासाठीच रद्द केला जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. तर, तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत 1-1 अशी बरोबरी केली होती. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. इंग्लंडसाठी पाचवा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. मात्र, असे असताना आता पाचव्या कसोटी सामन्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य योगेश परमार करोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर पाचव्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, भारत अरूण आणि आर. श्रीधर यांना करोनाची बाधा होती व या तिघांनाही त्यांच्या हॉटेलमध्येच विलगीकरणात ठेवले गेले आहे. त्यमुळेच या तिघांना चौथ्या कसोटीत संघासह राहता आले नव्हते. आता त्यांना पाचव्या सामन्यासाठीही संघासह राहता येणार नसून परमार यांनाही विलगीकरणातच राहावे लागणार आहे.
त्यातच आयपीएल स्पर्धेतील दुसरा टप्पा येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. जर खेळाडूंना करोनाची बाधा झाली तर त्याचा आयपीएलवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या सामन्यापूर्वीचे संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले असून सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे.