पिंपरी -शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो नागरिक संत ज्ञानेश्वरांच्या अलंकापुरीत दाखल झाले आहेत. प्रत्येक धर्मशाळा, हॉटेल आणि स्थानिक नागरिकांच्या घरी देखील भाविक व वारकरी वास्तव्यास आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन पंढरीला जातात. प्रशासनाकडून यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. महावितरणने देखील आपण वारीसाठी सज्ज असल्याची आणि सर्व तयारी केल्याची पत्रकबाजी केली. परंतु वारंवार वीज पुरवठा खंडित करत लाखो भाविक आणि आळंदीकरांचा घाम काढला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून दररोज आळंदीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी आषाढीवारीत सहभागी होण्याकरिता अलंकापुरीत दाखल झालेले वारकरी व आळंदीकर मात्र घामाघूम झाले आहेत. आषाढीवारीत सहभागी होण्याकरिता राज्याबरोबरच परराज्यातूनही लाखो भाविक आळंदी व परिसरात दाखल झाले आहे. ठिकठिकाणी रहुट्या व तंबू व धर्मशाळांमधून हरिनामाचा जागर होऊ लागला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला, तरीदेखील राज्यात दाखल होण्यास काही दिवसांचा कालावधी असल्याने राज्यता मोठा उकाडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत आषाढीवारीकरिता श्री क्षेत्र अलंकापुरीत दाखल झालेले हजारो भाविक आणि महावितरणकडून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे हे भाविक कमालीचे हैराण झाले आहेत. एरव्ही कधी कधी वीज पुरवठा खंडित होतो, परंतु गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महावितरणने पर्यायी लाइनवरून आळंदी व परिसराला वीजपुरवठा करावा, अशी मागणी आळंदीकर ग्रामस्थ व भाविकांकडून
होत आहे.
सार्वजनिक दिवे सुरू करण्याची मागणी
आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सार्वजनिक दिव्यांची डागडुजी केली आहे. मात्र, दत्त मंदिर परिसरातील काही भागांमधील सार्वजनिक खांबांवरील दिवे मात्र बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पालखी प्रस्थानाकरिता लाखो भाविक आळंदीत दाखल झालेले असताना खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक व वारकरी हैराण झाले आहेत. त्याचा आमच्या व्यवसायावरदेखील परिणाम होत आहे.
– प्रकाश रायकर, व्यावसायिक