कराड – आनेवाडी टोलनाका परिसराची स्वच्छता राखून तेथे प्रवाशांसाठी स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून द्यावीत. उड्डाणपूलावर व उड्डाणपूलाखाली पथदिवे लावण्यात यावेत. महामार्गाच्या दुभाजकामध्ये विविध जातीची फुलझाडे लावून मार्गाचे सुशोभिकरण करावे. अपघात क्षेत्र असलेला एस कॉर्नर काढला जावा. वेळे येथील उड्डाणपूलाचे काम मार्गी लावावे. तसेच महामार्गालगत असलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करा, अशा सूचना खा. श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
शिरवळ ते शेंद्रे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या संबंधित अधिका-यांसोबत कराड़ येथील त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली होती. यावेळी मार्गाच्या कामाचा आढावा घेऊन त्यांनी विविध सूचना केल्या. बैठकीसाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणेचे प्रकल्प व्यवस्थापक संजय कदम, पुणे-सातारा टोल रोड प्रा.लि.चे मॅनेजर संजय कुमार, राकेश कोळी, ए.शर्मा, डी.योगेशाप्पा व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, शेंद्रे ते शिरवळ निरा नदीपर्यंत महामार्गाच्या सेवा रस्त्याला खड्डे पडल्याने रस्त्ता खराब झाला आहे. त्याची दुरस्ती करुन हा रस्ता वहातूक योग्य करण्यात यावा. तसेच या रस्त्यावर काही ठिकाणी पाणी साचून रहात असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याचा सर्व्हे करून पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. मार्गावर पाणी साचल्याने शेतीचे नुकसान होते. पावसाळयात पाणी साचू नये यासाठी काळजी घ्या. सेवा रस्त्याचे काम करताना शेतकऱ्यांना सहकार्य करा.
शेंद्रे कारखाना ते खिंडवाडी दरम्यानचा रस्ता खचला असून चाको-या पडल्या आहेत. येथून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे हा रस्ता कॉंक्रिटकरण करून दर्जा सुधारावा. आनेवाडी टोल नाका नजिक असणा-या रायगाव फाट्यावर पथदिवे नसल्याने अंधाराचा फायदा घेत लूटमारीचे प्रकार घडत आहेत. तेथे त्वरीत पथदिवे बसविण्यात यावेत. सातारा ते शिरवळपर्यंत महामार्गावर दुचाकीसाठी वेगळी लाईन तयार करण्यात यावी. आनेवाडी टोलनाका परिसराची स्वच्छता ठेवून तेथे प्रवाशांसाठी शौचालयाची सुविधा करण्यात यावी. वेळे येथील नियोजित उड्डाणपूलाच्या कामाला गती द्यावी. तसेच येथील एस कॉर्नर काढून बोगद्याचे काम पूर्ण करावे.
महामार्गावरील बसथांब्याचा पुन्हा सर्व्हे करुन योग्य ठिकाणी बसथांबे करावेत. चुकीच्या ठिकाणी असणारे बसथांबे काढून नागरिकांच्या सोयीस्कर ठिकाणी बसथांब्यांची जागा बदलावी. काही ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असून त्याची दुरूस्ती करावी व आवश्यक जागेवर पथदिवे बसवण्यात यावेत. यासह अन्य सूचना खा.पाटील यांनी केल्या.