राष्ट्रीय महामार्गावरच प्रवाशी उतरले जात असल्याने नाराजी
उंब्रज – पुणे-बंगलोर महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असणारे उंब्रज ता. कराड येथील बसस्थानक म्हणजे फक्त शोपीस बनले आहे. उंब्रज परिसरातील प्रवाशी व नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या या बसस्थानकाचे महामंडळाच्या गाड्यांनाही सध्या वावडे असल्याचे दिसते. महामंडळाच्या अनेक गाड्या बसस्थानकात न येता राष्ट्रीय महामार्गावरच प्रवाशी चढउतार करतात. प्रवाशांच्या जिवाचे काही देणेघेणे नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला वाली कोण? असा प्रश्न परिसरातील नागरिक व प्रवाशांमधून विचारला जात आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय रहदारीच्या बसस्थानकापैकी उंब्रज येथील बसस्थानक आज अनेक बाबतीत चर्चेत आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महामार्गावरून धावणाऱ्या बस या नुकत्याच लाखो रुपयांचे नुतनीकरण करण्यात आलेल्या उंब्रज बसस्थानकात न येताच महामार्गवरच प्रवासी चढउतार करतात. यामुळे महामार्गावर सतत प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे अनेक अपघाताही घडले आहेत. वारंवार मागणी करूनही एसटी प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे.
उंब्रज बसस्थानकातील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने मार्च 2018 मध्ये बसस्थानकाचे सुशोभीकरण व दुरुस्तीची जवळपास बारा लाख रुपयांची निविदा जाहीर केली होती. परंतु येथे सुविधा मात्र झालेल्या नाहीत. येथील बसस्थानकाला लागलेले गैरसोयीचे ग्रहण काढून टाकून प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. यात प्रशस्त बैठकव्यवस्था, फलाटची सोय, स्वागतकक्ष, सुसज्ज उपहारगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे मुबलक व स्वच्छ पाणी, वाहनतळ या मुलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.
उंब्रज बसस्थानकाने परिवहन महामंडळाला नेहमीच नफा मिळवून दिला आहे. उंब्रज बरोबरच परिसरातील शेकडो गावे, वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांच्या दृष्टीने हे बसस्थानक महत्वाचे आहे. सातारा-कराड, तारळे, मसूर, चाफळ, चोरे ही महत्वाची गावे तसेच कोकणचे प्रवेशद्वार म्हणून उंब्रजची ओळख आहे.नियमित हजारो प्रवाशी, शाळा व महाविद्यालयीन शेकडो विद्यार्थी एसटीच्या माध्यमातून प्रवास करत असतात. परंतु महामंडळाची एस. टी. बसस्थानकात येत नसल्याने या सर्वांना आपला जीव मुठीत घेऊनच महामार्गावर थांबावे लागते.
तसेच लांब पल्ल्याच्या अनेक बसेस बसस्थानकात येत नाहीत. त्यामुळे सर्व वयोगटातील प्रवाशांना बस स्थानकामधून सर्व्हिसरोड ओलांडून परत महामार्गावर लोखंडी कठडे पार करून महामार्गावर जावे लागते. या सर्वांना आपला जीव टांगणीला लावून कसरत करावी लागते. तरीही कराड आगाराला जाग येत नसल्याचे दिसते. अधिकारी आपले अधिकार गाजवण्यात मशगुल तर लोकप्रतिनिधी राजकारणात मग येथील जनतेच्या समस्यांवर बोलायला कुणालाच वेळ नाही. उंब्रजच्या जनतेला कुणी वाली नाही का असा प्रश्न येथील नागरिकांमधून उपलब्ध केला जात आहे. फक्त निवडणुकीपुरते येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करून आगाराला याचा जाब विचारावा अशीही मागणी होत आहे.