राहू -दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे घामाच्या धारा निघत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे एकदमच तापमान वाढ झाली आहे. यामुळे लोक हैराण होत आहेत. त्यात भर म्हणून दोन दिवसांपासून विजेच्या बिघाडामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.
रखरखते ऊन, त्यातच विजेच्या लंपडाव सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसांत पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पाऊस ही झाला आहे. त्यामूळे उष्णतेत अजूनच वाढ होत आहे. दरम्यान, उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे शेतातील कामे सकाळी लवकर उरकण्याची शेतकऱ्यांची गडबड दिसून येत आहे.
दहानंतर उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरवात होत आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत व दुपारनंतर चार वाजण्याच्या पुढे शेततातील कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. शेळ्या-मेंढ्या चारणारे शेतकरी ही सकाळी लवकर जाऊन दुपारी आराम करीत आहेत. पुन्हा दुपारी चारनंतर शेळ्या-मेंढ्या चारत आहेत.