भिगवण – उजनी धरणाची पणीपातळी सध्या झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात 60 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
पुणे शहर परिसरातील बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पुणे बंडगार्डन तसेच दौंड येथून पाण्याचा मोठा विसर्ग उजनी धरणात होत आहे. धरणात पाणीसाठा वाढत असल्याने यंदा 18 जुलै रोजी मृतसाठ्याची पूर्तता होऊन उपयुक्त पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. त्यानंतर बरोबर महिनाभरात उजनी धरण 60 टक्के भरले आहे. धरणात सध्या 494.78 मीटर एवढी पाणीपातळी आहे.
धरणात एकूण पाणीसाठा 93.70 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 30 टीएमसी झाला आहे. बंडगार्डन येथून 17472 तर दौंड येथून 19584 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पावसाची हीच स्थिती राहिल्यास लवकरच धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. भिगवण परिसरात तर दरवर्षी पडणाऱ्या पावसाची सरासरी ओलांडली आहे.
महाराष्ट्र बॅंकेच्या माती परिक्षण केंद्राच्या नोंदीनुसार भिगवण परिसरात आजअखेर 532 मिमी तर भीमा खोऱ्यात सरासरी 490 मिमी इतका पाऊस झाला आहे. मात्र, आता पाऊस न थांबल्यास खरिपातील बाजरी, मका, सोयाबीन आदी पिके व आडसाली ऊस लागवडी अडचणीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.