मुंबई – राज्यसभा निवडणूकीच्या निकालात सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला असून शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालानंतर भाजपाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज (दि.12) सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, शिवसेना सांगत होती की तीन जागा जिंकणार पण शेवटी काय झालं? सहाव्या जागेवर भाजचा उमेदवार विजयी झाला. संयज राऊत देखील काठावर पास झाले. आमच्या हातून संजय राऊत वाचले. ते सत्तेत आहेत. शिवसेना अल्पमतात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते. जी भाषा वापरायला नको अशा भाषेत बोलत होते. ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रू झाली आहे. नैतिकतेचं भान असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे नारायण राणे म्हणाले.
दरम्यान, राज्यसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की, काही अपक्ष आमदार शिवसेनेला मतदान करणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी भाजपला मतदान केले. त्यांची यादी शिवसेनेकडे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.