मुंबई – नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं. सेनेची संतप्त आंदोलनं, भाजप कार्यकर्त्यांचे राणे यांच्या समर्थनार्थ मोर्चे व अखेर राणे यांना अटक व जामीन अशा वादळी घडामोडींमुळे मंगळवार (दि. २४) विशेष गाजला.
राणेंना जामीन मिळाला असला तरी हे प्रकरण इतक्यात शांत होणार नाही असंच राणे यांच्या पत्रकारपरिषदेतील वक्तव्यांवरून दिसतंय. ठाकरे यांच्या पूर्वीच्या काही वक्तव्यांचा दाखल देत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. राणेंच्या प्रश्नाला राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिल आहे.
राणे यांनी, २०१८ मधील उद्धव ठाकरे यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील वक्तव्य वाचून दाखवले. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. ठाकरे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी याबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी योगींबाबत ते विधान का केले याचा खुलासा केला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाबद्दलचे होते. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना चप्पल घालून हार घातला जात नाही. ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. हा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांप्रति असलेला सन्मान आहे.” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
पालघर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी २६ मे २०१८ ला हे वक्तव्य केलं होत. यामध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका करताना दिसतायेत. तसेच ‘योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारायला हवं’ असं वक्तव्य देखील ठाकरे यांनी केल्याचं दिसतंय.
उद्धव ठाकरे या व्हीडीओमध्ये, “ते काल पर्वा काहीतरी योगी आदित्यनाथ आले होते. योगी म्हणे योगी. हा कसला योगी? हा तर भोगी. आणि योगी असेल तर मुख्यमंत्री कसा होऊ शकतो? योगी आहे म्हंटल्यावर त्याने सर्वकाही त्याग करून कुठेतरी गुहेत जाऊन बसायला पाहिजे. तू मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत जाऊन योगी म्हणवतोस? हा योगी असूच शकत नाही.आणि उत्तर प्रदेशमधून आल्यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचं नातं हे त्या योगीला पहिल्यांदा सांगायला पाहिजे.” असं वक्तव्य करताना दिसतायेत.
ते पुढे म्हणतात, “शिवरायांना राज्याभिषेक करायला गागाभट्ट आले होते उत्तर प्रदेशातून. त्यांनी किती सन्मानाने शिवरायांचा राज्याभिषेक केला. आणि हा योगी जो आला टरटरुण. गॅसचा फुगा असतो ना काही नसत गॅस असतो पण हवेत उडत असतो तसा हा गॅसचा फुगा. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. सरळ चपला घालून. असं वाटलं त्याच चपला घ्यावा अन् त्याच थोबाड फोडाव. लायकी तरी आहे तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाण्याची?”