मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेमधील (Shiv Sena) आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून संघर्ष सूरु आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र शिंदे गटाचा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “दसरा मेळाव्यासाठी अर्ज करणाऱ्या टोळक्याने आधी आरशात पहावे. शिवसेना ही ठाकरेंची आहे हे कोणीही सांगेल. कोणत्याही गटाने किंवा टोळीने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा म्हणून कोणी बीएमसी किंवा सरकारकडे अर्ज केला असेल तर त्यांनी आधी स्वतःला विचारावं की आपण शिवसेना आहोत का? जगाच्या पाठीवर जाऊन कोणालाही विचारा शिवसेना कुणाची ते बाळासाहेब ठाकरेंनाच ओळखतात. एकनाथ शिंदेंना कोणीही ओळखत नाही. आता माघार घेतली आहे. दिल्लीच्या मदतीनं पक्ष चोरला, चिन्ह चोरलं आणखी काय चोरणार आहेत.”
यावेळी संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर देखील निशाणा साधला. “केसरकर म्हणजे सावंतवाडीतील मोतीतलावातला डोमकावळा आहे. हा केवळ पदासाठी सत्तेत आला आहे. त्यांच्या शिवसेनेत येण्याला आमचा विरोध होता, हा सत्तेसाठी पाठी खुपसून निघून जाईल. आता आम्हाला खात्री आहे की हा शिंदेच्या पाठीत चाकू खुपसून भाजपत निघून जाईल, असे म्हणत दीपक केसरकरांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला.
तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊन नये आणि घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा मोदी शाहांची मोठेपणा सांगणाऱ्यांना शिवसेनेचा विचार मांडण्याचा त्यांना अधिकार नाही. शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार आहे.”