जालना – कुणबी जात प्रमाणपत्रासाठी (Kunbi Caste Certificates) तब्बल 17 दिवस उपोषण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण अखेर काल मुख्यमंत्र्यांनी सोडवले.
“लागेल तेवढा वेळ घ्या, पण कुणबी जात प्रमाणपत्र द्याच’ अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. उपोषण सुटल्याच्या दिवशीच नारायण राणे यांनी मात्र 96 कुळी मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र नकोत, असे वक्तव्य केल्यानंतर जरांगे पाटलांनी नारायण राणे (Narayan Rane) यांना चोख उत्तर दिले आहे.
नारायण राणे यांनी त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी त्यांनी आपली भूमिका जाहीर केली असून, ते म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ही आमची मागणी आहे.
कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचे की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या आरक्षणामुळे (Maratha Reservation) गोरगरीब मराठा समाजातील पोराचं कल्याण होणार आहे. ज्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण लागतं तर ते कुणबी प्रमाणपत्र काढू शकतात. हे प्रमाणपत्र घेतलेच पाहिजे, ही जबरदस्ती नाही, असाही टोला जरांगे पाटील यांनी लगावला आहे.