मुंबई – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि केसीआर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असे म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत.
या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर राव म्हणाले, महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. पण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली नव्हती. पण तरीही शिवसेना नेते संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ममता दीदींची भेट घेतली होती. त्यानंतर ममता यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर
भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने आपलं धोरण बदलायला हवे. असं न केल्यास पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहेत, अशा शब्दांत के.सी. राव यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले.
यशोमती ठाकूर यांचे सूचक ट्विट
कॉंग्रेसला वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील लढाई यशस्वी होणार नाही. कॉंग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे “संघी’ अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहत असून विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती कॉंग्रेसमुळेच आहे, असे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.