चंद्रपूर – शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेच्या लालसेपोटी विचारसरणीशी तडजोड केली आणि भाजपच्या पाठीत वार केला, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. परंतु नवीन सरकार त्यांना योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिली.
चंद्रपूर येथील “विजय संकल्प’ रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या जाहीर सभेच्या माध्यमातून 2024च्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, खासदार रामदास तडस उपस्थित होते.
नड्डा म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर माथा टेकता-टेकता ठाकरे यांचा माथाच झुकला आहे.
Addressing a public meeting in Chandrapur, Maharashtra. https://t.co/Fba6ePr0By
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 2, 2023
2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे यांनी भाजपशी संबंध तोडत आमच्या पाठीत वार केला. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र, गतवर्षी जूनमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारले आणि ठाकरे सरकार कोसळले.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असून ते महाराष्ट्राला विकासाकडे घेवून जात आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मात्र ज्वाईन्टली एक्वायर मनी अशा पध्दतीने केवळ पैसा ओरबाडण्याचे काम केले. याच भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन मंत्री कारागृहात गेले. त्यातील एक माजी मंत्री नुकतेच कारागृहातून सुटून बाहेर आले तर एक कारागृहात अजूनही शिक्षा भोगत असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
तसेच युक्रेन युध्द सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलून युक्रेन युध्द थांबविले होते. त्यानंतर भारतातील 32 हजार विद्यार्थ्यांना युध्द भूमितून भारतात आणले. जोवर विद्यार्थी भारतात परतले नाही तोवर युध्द थांबवून ठेवले. अमेरिका, ब्रिटेन, पाकिस्तान यांनाही जे करता आले नाही ते मोदींनी केल्याचे नड्डा म्हणाले.