आ. मकरंद पाटलांच्या भेटीसाठी खा. उदयनराजे बोपेगावात
कवठे – केंद्राच्या धोरणामुळे गेल्या पाच वर्षांत औद्योगिक क्षेत्र डबघाईला येऊन अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. व्यापारी वर्गात अगोदरच जीएसटी व नोटाबंदीमुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून, शेतकऱ्यांचीही अवस्था खूपच दयनीय झाली आहे. कुठल्याही प्रकारची निर्णयक्षमता नसणारे लोक ज्यावेळी पदावर जातात तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्यावर फार मोठा अन्याय करतोय असे मी समजतो. अशी खरपूस टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
बोपेगाव (ता. वाई) येथे आमदार मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रतापराव पवार, उपसभापती अनिल जगताप, विक्रांत डोंगरे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, सत्यजित वीर, रमेश गायकवाड, रवी जाधव, मनीष भंडारे, मधुकर भोसले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. आजचा सत्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीत मदत केलेल्यांच्या गाठीभेटी घेतोय.
हा लोकसभेचे निकाल अनपेक्षित होते. न्यायाधीश, निवडणूक आयोगाच्या नेमणूक यांनीच केल्या आहेत. लोकशाहीत सगळे समान असतात. प्रत्येकाला कायदा वेगळा नसतो. हे सर्व चुकीच चालले आहे. गेल्या पाच वर्षांत देशात लोकशाही ऐवजी हुकूमशाहीच सुरू झाली आहे. मी याबाबत अनेकदा माझे मत व्यक्त केले आहे. निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक प्रचार चालू असताना इतर पक्षांना बंधने घातली होती. मात्र नमो टिव्हीच्या माध्यमातून यांचा प्रचार सुरू होता. दिवसभर तेच तेच दाखवूनही लोकांच्या मनावर परिणाम झाला नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.
लोकांमध्ये उद्रेक होऊ नये म्हणून एक्झिट पोल प्लॅनिंगने तयार करून निकाल आधीच दाखवून दिले. निकाल लोकांच्या मनाविरुद्ध लागल्यास कोठेही निदर्शने होऊ नयेत. हा एक्झिट पोल दाखविण्याचा त्यांचा मूलभूत हेतू होता. पण जनता काही मूर्ख नाही. शासनाच्या धोरणामुळे ज्या कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्या केली, त्या कुटुंबातील एकतरी मत यांना मिळू शकते का. असे असतानाही त्यांना त्या कुटुंबाचे मतदान झाले आहे. म्हणजे या एवढी शोकांतिका होऊ शकत नाही. अमेरिकासारख्या देशानीही निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर बंद करून पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच मतपत्रिकांचा वापर सुरू केला आहे. या मतदानात तुम्ही कोणताही बाहेरुन बदल किंवा हस्तक्षेप करू शकत नाही. संगणका एवढे ईव्हिएम मशीन अवघडपणे बनविले जात नाही. जर तुमचा संगणक हॅक करू शकता तर हे मशीन आहे.
मोठ्या प्रमाणावर अपेक्षित नसलेला हा धक्कादायक निकाल लागला असला तरी त्यात ऍडजेस्टमेंट करून निकाल लावला आहे असे माझे मत आहे. ज्या ठिकाणच्या हमखास निवडूण येणाऱ्या जागा आहेत तिथे त्यांनी काहीही बदल केले नाहीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अक्षेर्पाह वक्तव्य करणारे जर या निवडणूकीत निवडून येत असतील तर यासारखे मोठे दुर्दैव नाही. अत्यंत कडकोट बंदोबस्त असणाऱ्या राष्ट्रपती भवनातून महत्त्वपूर्ण अशी राफेलसारखी फाईल गायब होते. या फाईलच्या कपाटापर्यंत ज्यांना अधिकार आहेत असेच पोहचू शकतात.
मोबाईलच्या टॉवरच्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट चीनमधील कंपनीला दिले आहेत. भारताच्या इतिहासात असे पहिलेच पंतप्रधान आहेत की ज्यांची अंतर्गत सुरक्षाव्यवस्था इस्त्रायलच्या मोझॅकची आहे. राष्ट्रभक्ती व राष्ट्रहित हे मुद्दे आता डिक्शनरीतच पाहायला मिळतात. ज्या लोकांनी पक्ष स्थापन केला त्या अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांचीही यांनी फार दयनीय अवस्था करून टाकली. लोकांच्या हितासाठी बऱ्याचवेळा माझ्यावर रोष व्यक्त होतो. पण त्याचा काही फरक पडत नाही. जे लोकांच्या हिताचे असेल ते मी बोलतो.
मदतीची परतफेड वाट्टेल त्या परिस्थितीत करेन
निवडणुकीच्या काळात अनेकांनी शंका बोलून दाखविल्या की, तुमची निवडणूक झाल्यानंतर पुढे काय. पण तुम्हा सर्वांना एकच ग्वाही देतो की, आमदार मकरंद पाटील यांनी निवडणुकीत जी मदत केली त्याची परतफेड वाट्टेल त्या परिस्थितीत करेन. त्याबद्दल कोणीही कसलीही मनात शंका ठेवू नका. चार महिन्यात आचारसंहिता लागू होईल. दिवस थोडे राहिले आहेत. निकाल काही लागले असले तरी खचून जायचे काही कारण नाही. काय होत नाही. तुम्ही फक्त बरोबर राहा. आबांना पहिल्यासारखीच खंबीर साथ द्या. आपण सगळे मिळून काय करायचे ते करूच. अशा माझ्याकडे बऱ्याच स्किम असतात. जरी आम्ही दोघेही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये असलो तरी लाइन दोरी तीच आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. असे मिश्किलपणे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.