मुझफ्फरपूर – बिहारमध्ये विषारी दारूमुळे दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 15 दिवसांत बिहारमध्ये विषारी दारूमुळे किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आज झालेली ही मृत्यू होण्याची घटना मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आहे. कांती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली.
मरण पावलेले दोघेही सिरसिया गावातील होते, असे मुझफ्फरपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जयंत कांत यांनी सांगितले. विषारी दारूमुळे आणखीन दोघेजण आजारी पडले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. सर्व संबंधितांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यातून हा प्रकार विषारी दारूमुळेच घडला असल्याचे निष्पन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.
सराईया पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विषारी दारूमुळे 5 जणांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी पश्चिम चंपारण, गोपालगंज, समस्तिपूर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यूच्या घटना घडल्या होत्या. दिवाळीच्या सुमारास झालेल्या या घटनांमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे.