कोलकाता – अगदी अलीकडच्या काळात केंद्र सरकारला इंधनावरील करवाढीतून चार लाख कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, ते त्यांनी सर्व राज्यांना समप्रमाणात वाटून द्यावे, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
त्यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितले की केंद्र सरकार इंधनावर जादाचा उत्पादन शुल्क आणि अन्य सेस लावून लक्षावधी कोटी रुपयांचा माल कमवत आहे आणि ते राज्यांना व्हॅट कमी करण्यास सांगत आहेत. राज्य सरकारे हा पैसा आणणार कोठून असा सवाल त्यांनी केला आहे.
त्यापेक्षा अलीकडच्या काळात केंद्राला या करवाढीतून जो चार लाख कोटी रुपयांचा जादाचा महसूल मिळाला आहे तो त्यांनी सर्व राज्यांना समप्रमाणात वाटून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, सध्या राज्यांवर मोठाच आर्थिक ताण आला आहे.
केंद्राकडून पुरेशा प्रमाणात मदत मिळत नाही तरीही आम्ही येथे सबसीडी व अन्य कल्याणकारी योजनांसाठी पैसा खर्च करीत आहोत. आम्हाला इंधनावर कमी करआकारणी करण्याचा सल्ला देण्यापेक्षा आमचे थकलेले पैसे केंद्राने त्वरित आम्हाला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
केंद्राने प्रत्येक बाबतीत पश्चिम बंगालवर अन्याय केला आहे.अगदी लसीच्या वाटपातही त्यांनी आमच्यावर अन्याय केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.