लखनौ – उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये शुक्रवारी विषारी दारू प्यायल्याने 11 जण मृत्युमुखी पडले. आणखी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मृतांमध्ये अलिगढच्या आसपासच्या गावांमधील ग्रामस्थ आणि काही ट्रकचालकांचा समावेश आहे. एका परवानाप्राप्त दुकानातून घेतलेल्या दारूने त्यांचा बळी घेतला. संबंधित दुकान सील करण्यात आले. तसेच, तेथील दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले.
विषारी दारू दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे समजते. संबंधित परिसरात विषारी दारूची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.