शिरवळ – घोरपडीसाठी जाळी लावून बसलेल्या दोघांनी जाळीत सापडलेल्या चार मुंगसांना ठेचून मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खंडाळा वन विभागाने मुकेश व्यंकण्णा विनिकोंडा (वय 20) व संपत अर्जुन आलम (वय 41) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार पुणे शहरामध्ये हे दोघे संशयित जडीबुटी आणि वनौषधी विकण्याचा व्यवसाय करतात. शिरवळ परिसरात असणाऱ्या फुलमळा शिवारामध्ये विनीकोंडा याने घोरपड पकडण्यासाठी जाळे लावले होते. या जाळीमध्ये घोरपड अडकण्याऐवजी चार मुंगसे अडकली. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याऐवजी या दोघांनी त्यांना ठेचून मारले.
या मुंगसांची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना खंडाळा वन विभागाच्या पथकाने छापा मारून त्या दोघांना पकडले. त्यांच्याकडील मृत मुंगसे ताब्यात घेण्यात आली आहेत. खंडाळ्याच्या वनक्षेत्रपाल प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राहुल जगताप, वनरक्षक वसंत गवारी, प्रकाश शिंदे यांनी ही कारवाई केली. मुंगूस हा प्राणी वन विभागाच्या परिशिष्ट एकमध्ये येतो. विनीकोंडा आणि आलम यांची वन विभागाच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.