कलम 370 वरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना ठणकावले
कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. त्यातच आज प्रचारासाठी मिळणारा शेवटचा रविवार असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या राज्यभरात सभा होत आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोल्हापूरात प्रचारसभा झाली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करून तिथल्या लोकांना विकासाच्या जवळ घेवून जाण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच एकाच देशात दोन कायदे चालणार नसल्याचे सांगत विरोधकांना ठणकावले.
कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांचे पुरामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण आम्ही सांगली, कोल्हापूरला पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवून दाखवू. यासाठी भारत सरकार महाराष्ट्र सरकारला पूर्ण मदत करेल असे आश्वासन भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिले. तसेच आम्ही जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून काश्मीरला भारतासोबत जोडले. कलम 370 हटवण्याची कोणाची हिंम्मत नव्हती. 56 इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून दाखवले. एका देशात दोन कायदे चालणार नाहीत असे शाह यांनी ठणकावून सांगितले.
केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना दहशतवादी भारतात घुसायचे. आपल्या जवानांवर हल्ला करायचे. पण मनमोहन सिंग मौनात असायचे. नरेंद्र मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करुन जशास तसे उत्तर दिले. कॉंग्रेसने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दावर काही केले नाही आणि भाजपाकडून जे निर्णय घेतले जातात. त्याचा कॉंग्रेसकडून विरोध केला जातो असे शाह म्हणाले. शरद पवार विचारतात कलम का हटवलं ?. कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले जेव्हा तुमच्याकडे प्रचाराला येतील तेव्हा त्यांना जाब विचारा असे शाह म्हणाले.