नारायणगाव / बेल्हे – कांदळी औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीची पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर झाला आहे. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली, राजकुमार कलेश्वर ठाकुर (वय 15, सध्या, रा. कांदळी वसाहत, ता. जुन्नर, मूळ रा. बिहार) व बिट्टुकुमार महेंद्र यादव (वय 19, सध्या रा. कांदळी वसाहत, मूळ रा. बिहार), असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.रसुल युनुस तांडेल (वय 35) हा गंभीर झाला आहे.
फिर्याद जावेद अस्लम शेख (रा. वारुळवाडी, ता. जुन्नर) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मौजे कांदळी गावच्या हद्दीत फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीजमध्ये (दि. 4) सकाळी कंपनीचे मालक यांच्या सांगण्यावरून कंपनीमध्ये असलेल्या हे दोघे पाण्याची टाकी साफ करण्यास गेले होते.
राजकुमार ठाकुर व बिट्टुकुमार यादव हे पाण्याच्या टाकीत उतरले. रसुल तांडेल हा बाहेर उभा होता. राजुकुमार हा शिडीवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेल्याने तो टाकीत पडला. त्याला वर काढण्यासाठी बिट्टु यादव याने हात दिला असता तो सुध्दा पाण्याचे टाकीत पडला. त्यांना पाण्यात पडलेले पाहून रसुल तांडेल हा टाकीत उतरला. परंतू तो सुद्धा पाण्यात पडला.
\त्यानंतर त्यांना बाहेर काढून बाहेर काढून त्यांना तात्काळ नारायणगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच राजकुमार ठाकुर व बिट्टू कुमार यादव यांचा मृत्यू झाल्याचे डॉ सदानंद राऊत यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे करीत आहेत.