सातारा (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील दोन रुग्णांचा ‘सारी’ने म्रुत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ४ मे रोजी रात्री उशिरा ८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी २ जणांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे (सारी) मृत्यु झाला.
संशयित म्हणून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित ६ जणांच्या घशातील नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २७, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील २, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील ३२ असे एकूण ६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.