कराड सव्वाचार लाख रुपये घेऊन आणि बोगस विवाह लावून देत, दोन युवकांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रमेश तानाजी नांगरे (रा. शेखरवाडी, ता. वाळवा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वर्षा जाधव (सुलतानगादे, ता. खानापूर, जि. सांगली), शंकर थोरात (वसंतगड, ता. कराड), पूजा ऊर्फ स्नेहल पाटील व पूजा यादव (जवाहरनगर, इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वर्षा जाधव आणि शंकर थोरात यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वसंतगड येथील शंकर थोरात हा विवाह ठरवत असल्याची माहिती शेखरवाडीतील रमेश नांगरे या युवकाला मिळाली. त्यानुसार शेखर व त्याच्या चुलत्यांनी वसंतगड येथे शंकर थोरात व वर्षा जाधव यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी विवाह ठरविण्यासाठी रमेश नांगरेकडून 2 लाख 25 हजार रुपये घेतले. 15 एप्रिल रोजी पूजा पाटील या मुलीला दाखविले. मुलीची पसंती झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी पलाश हॉलमध्ये दोघांचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पूजा शेखरवाडीत होती. आठव्या दिवशी पूजेसाठी मुलीची आई, मावशी, मावस बहीण आणि दाजी शेखरवाडीला आले.
दुसऱ्या दिवशी ते पुन्हा शेखरवाडीला येऊन पूजाला काही दिवसांसाठी माहेरी इचलकरंजीला नेतो, असे सांगून तिला घेऊन गेले. दरम्यान, दोनच दिवसांनी विश्रामबाग-सांगली पोलीस ठाण्यात वर्षा जाधव, शंकर थोरातवर गुन्हा दाखल झाल्याचे रमेश नांगरेला समजले. त्याला संशय आल्याने पूजा यादवच्या मोबाइलवर फोन करून पत्नी पूजा पाटील हिला सासरी कधी पाठवणार, अशी विचारणा केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पत्नी सासरी न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्याने पोलिसात फिर्याद दिली. तत्पूर्वी, येणके, ता. कराड येथील युवकाचीही या टोळीने फसवणूक केली आहे. संबंधितांनीच 15 डिसेंबर 2022 रोजी दोन लाख रुपये घेऊन येणकेतील युवकाचा साक्षी साळुंखेशी विवाह लावला. विवाहानंतर 25 ते 30 दिवस साक्षी येणके येथे राहिली. मात्र, आजारी बहिणीला इंदापूर येथून भेटून येते, असे सांगून साक्षी घरातून निघून गेली, ती परत आली नाही. त्यामुळे संबंधित युवकाचीही दोन लाखांची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.