परिसरात कमी पावसावर येणाऱ्या पिकाला प्राधान्य
काऱ्हाटी (वार्ताहर) – येथील परिसरात तूर पीक फुलोऱ्यात आले आहे. बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील जिरायती भागांमध्ये कमी प्रमाणातील आठमाही पावसावर चिकाटीने शेती करण्याचा प्रयत्न करत असलेला शेतकरी निसर्गाच्या पुढे हात टेकत आहे.
या परिसरामध्ये कमी पाण्यावर येणारे पीक, हुलगा, मटकी, ज्वारी, बाजरी याबरोबर आता परिसरातील शेतकरी तूर पिकाला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या तुरीचे बियाणे कऱ्हामाई ऍग्रो कंपनीच्या वतीने इक्रिसॅट हैदराबाद आणि कूषी विज्ञान केंद्र, माळेगाव येथून आणण्यात आले होते. त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीकडे लक्ष दिल्याने 2016 पासून तुरीच्या उत्पादनामध्ये विलक्षण वाढ झाल्याचे कऱ्हामाई ऍग्रोचे चेअरमन विजय साळुंखे यांनी सांगितले. तुरीचे उत्पादन वाढत असल्याने आणि चांगला बाजारभाव मिळत असल्याने या परिसरातील शेतकरी देखील समाधानी आहे.
तूर पीक हे ग्रामीण भागातील लोकांना जास्त प्रमाणावर माहीत नव्हते कंपनीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत आणण्याचे काम केले 2017 साली शासनाने हमीभाव ठरून कंपनीस खरेदी केंद्र दिल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा झाला.
– वसंत जाधव, कऱ्हामाई अग्रो कं., काऱ्हाटी
तूर पिकास जास्त पाणी लागत नाही. औषध फवारणी खर्च कमी होतो. एकरी 12 क्विंटल उत्पन्न आहे. जिरायत भागासाठी हे पीक चांगले आहे. सरकारने जर ठराविक हमीभाव दिला तर जिरायती पट्ट्यातील शेतकरी या पिकाकडे वळेल आणि दारिद्य्ररेषेच्या वर येण्यास त्याला मदतच होईल.
– संजय जाधव, शेतकरी, कऱ्हाटी