खाण्यासाठी जन्म आपुला अशा वृत्तीने अनेकजण जगत असतात. सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे, अगदी भरपेट म्हणतात तसा आनंद लुटणे हा त्यांचा छंदच असतो. खाताना मर्यादा न राहिल्यामुळे, वेळीअवेळी आणि अरबट चरबट खाण्याने परिणाम व्हायचा तोच होतो. पोट बिघडते, अपचन होते. करपट ढेकर येऊ लागतात.
वेळीअवेळी पोटात अन्न अक्षरश: ढोसल्यावर आधी अपचन आणि नंतर बद्धकोष्ठतेचा खेळ सुरू झाला, की मग सारी धडपड सुरू होते. कोणाच्या तरी सल्ल्याने त्रिफळा चूर्ण घेण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या रेचकांची (पोट साफ करणारी औषधे) रीघ लागण्यास सुरुवात होते. आयुर्वेदीय औषधांना साईड इफेक्ट्स नसतात हा आपला गैरसमज असतो. मग काय? आधी दिवस मग महिने आणि मग वर्षानुवर्षे ही रेचके आपली सोबती होतात. मग जाणवू लागतात त्याचे दुष्परिणाम.
रेचकांचा प्रदीर्घ काळ वापर केल्याने आतड्यांना शुष्कता येते आणि त्यांची कार्यक्षमता घटते. नेहमीच्या सवयीमुऴे रेचकांचा प्रभाव कमी होऊ लागतो. रेचकांचा परिणाम होत नाही, हे जाणवले की मग स्वाभाविकपणे आपण त्यांचे अधिक मात्रेत सेवन करू लागतो. सहा सहा ग्रॅम इतक्या अधिक मात्रेत रेचक सेवन करूनही पोट साफ न होण्याची तक्रार असलेली मंडळी आहेत. ही वाढीव मात्रा अधिक घातक ठरत जाते.
जवळपास बहुतेक रेचक चूर्णात सोनामुखी ही वनस्पती वापरलेली असते. या सोनामुखीच्या प्रदीर्घ वापराचे बरेच दुष्परिणाम होतात. विशेषतः सोनामुखी या वनस्पतीमुळे पित्ताचे त्रास वाढतात. शिवाय सोनामुखीसारख्या वनस्पती गरोदर स्त्री व बाळंतीण यांनी घेणेही अपायकारक असते.
बऱ्याच लोकांना सारखे ढेकर येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे प्रमाण तुलनेने जास्त आढळते. वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जीवाणू प्रक्रिया. बध्दकोष्ठता असल्यावर मोठ्या आतड्यात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा असतो. आजकालच्या बैठ्या आणि कमी श्रमाच्या जीवनपध्दतीत पोटात गॅस होणे हे अगदी स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे.