Truck Driver Strike – केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला राज्यभरातून विरोध केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (दि. 1) राज्यभरात ट्रक चालक ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून तेस महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. याचा सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसला. या आंदोलनाचा परिणाम बस वाहतुकीवर देखील झाला आहे. आज सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा आगारातून 250 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. या बस फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे सात लाखांचा फटका भंडारा आगाराला बसला तर अनेक प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली.
ट्रक चालकांनी नागपूर – कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. अगदी सकाळपासून भंडारा आगारात अनेक प्रवासी नागपूरच्या दिशेने प्रवास करण्याकरिता पोहोचले होते. अनेकांनी बसचे तिकीटही काढले होती. मात्र, त्यानंतर वाहकांनी काढलेले त्यांचे तिकीट रद्द करीत त्यांना तिकिटाचे पैसे परत केले. बराच वेळपर्यंत प्रवाशांना नागपूरच्या दिशेने कुठलीही बस न मिळाल्याने अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, गोंदिया शहरातील कुडवा चौक येथे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी रामनगर पोलिसांनी 13 चालकांना ताब्यात घेतले आहे. बुलढाणा जिल्ह्यात देखील ट्रक चालक आक्रमक होतांना पाहायला मिळाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूर-घोडसगाव नजिक रस्त्यावर टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला. एक तासांहून अधिक वेळ महामार्ग अडवून वाहन चालकांनी घोषणाबाजी केली. यासह राज्यभरात विविध ठिकाणी ट्रक चालकांचा संप सुरु आहे.
नेमका काय आहे नवा कायदा –
केंद्र सरकारने नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक नवीन कायदे केले. त्यात भारतीय न्याय संहिता २०२३ हा कायदा संमत केला आहे त्यातील तरतुदीविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ट्रकचालक संपावर गेले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. नवीन कायद्यातील हिट अँड रन विषयी अनेक गैरसमज आहेत. नेमका कायदा काय आहे ते जाणून घेऊया..
वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे अपघात झाला. त्यात कोणाचा मृत्यू झाला व तो झाल्यास चालक पळून गेला असल्यास त्याला हिट अँड रन केसेस असे म्हणतात. यामध्ये चालकाला 2 वर्षांची शिक्षा आणि आर्थिक दंड असे प्राविधान या आधीपासूनच आहे.
नवीन संशोधनानुसार निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे वाहन चालवून, वाहनचालक कोणाच्या मृत्युस जबाबदार ठरल्यास, त्याला 5 वर्षापर्यंतची शिक्षा प्रस्तावित आहे. तो वाहनचालक अपघातग्रस्त व्यक्तीला मृत्युच्या दारात सोडून, पोलिसांना न कळविता तसेच रुग्णालयात न नेता पळून गेल्यास व तसेच सिद्ध झाल्यास त्या चालकाला 10 वर्षाची शिक्षा व 7 लाखांचा दंड ठोठावण्यात येईल.
जर का घडलेली घटना हा पूर्णत: अपघात असेल, वाहनचालकाने वाहन निष्काळजीपणे किंवा बेजबाबदारीने चालवले गेले नसेल तर अशा परिस्थितीत या शिक्षेचे प्रावधान नाही. परंतु, परवाना नसताना वाहन चालवणे, मद्यपान करुन वाहन चालवणे, नो एंट्रीतून वाहन चालविणे, वेगमर्यादेचा भंग करुन वाहन चालवणे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लघंन केल्यामुळे अपघात झाला असेल आणि त्या परिस्थिीमध्ये वाहनचालक अपघातग्रस्त व्यक्तीला मृत्युच्या दारात सोडून पळून गेला असेल आणि त्यांनी पोलिसांना कळवले नसेल तर त्याचा समावेश सीआरपीसी 304 अ मध्ये होईल व तरच या शिक्षेचे प्रावधान करण्यात आलेले आहे. हा कायदा अजून लागू करण्यात आलेला नाही. 1 एप्रिल 2023 पासून त्यांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.