मुंबई- कॉंग्रेस पक्ष जागावाटपाबाबत गांभीर्य दाखवत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. जर जागावाटपाबाबत निर्णय घेण्यास कॉंग्रेसने अजुन उशीर केला तर त्याचा भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांनाच लाभ होईल असे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, विरोधी पक्षांशी जागावाटपाच्या चर्चा करण्याऐवजी कॉंग्रेस पक्ष राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या तयारीतच व्यस्त झाल्याचे पाहुन आपण चकित झालो आहोत. ते आघाडीसोबत निवडणूक लढण्याबाबत गंभीर आहेत की नाही हे त्यांनी स्पष्ट सांगून टाकावे.
आघाडीबाबत केवळ चर्चा करणे पुरेसे नाही. तुम्ही लढणार आहात की नाही ही तुमची मनिषा स्पष्टपणे सांगितली पाहिजे. देशभरात आकाराला आलेल्या २६ राजकीय पक्षांच्या इंडिया आघाडीच्या संदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र केले आहे आणि कॉंग्रेस पक्षाने सगळे आपल्या हातात घेतले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नाही तर आपण कोणत्या जागांवर लढायचे हे आपले आणि उध्दव ठाकरे यांचे अगोदरच ठरले असल्याचेही आंबेडकर म्हणाले. प्रादेशिक पक्ष निवडणूक लढण्याबाबत गंभीर आहेत. मात्र राष्ट्रीय पक्षांमध्ये तेवढे गांभीर्य दिसून येत नसल्याचा दावा त्यांनी केला.