नारायणगाव, (वार्ताहर) – पुणे-नाशिक रेल्वेसाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 हजार 123 दिवसांमध्ये (अंदाजे साडेतीन वर्षे) पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार आहे, असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
कल्याण- मुरबाड, पुणे- नाशिक, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वेच्या भूसंपादनाच्या निधीसाठी राज्य सरकारने तरतूद केली असून भूसंपादनाचे काम चालू आहे. पूर्वी पुणे-नाशिक रेल्वेसाठी 60 टक्के कर्ज, 20 टक्के राज्य व 20 टक्के केंद्र सरकारचा निधी असा प्रकल्प होता; परंतु केंद्र सरकारचा निधी न घेता 60 टक्के कर्ज व 40 टक्के राज्य सरकारच्या निधीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या महा रेलच्या माध्यमातून पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पूर्ण होणार आहे.
ग्रामीण भागातील विशिष्ट घरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर सौर योजनेचे उद्दिष्ट राज्य सरकारने हाती घेतले आहे. 60 टक्के सबसिडीच्या माध्यमातून घरावर सौरऊर्जेचा प्रकल्प बसवला जाईल. त्यातून निर्माण होणारी 300 युनिटपर्यंतची वीज घरमालकाला मोफत देण्यात येणार आहे.
उर्वरित वीज वितरित केली जाईल. दिवसा वीज मिळावी तसेच गावातील पाणीपुरवठ्याच्या योजना, रस्त्यावरील पथदिवे, शेततळ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारी वीज त्याच गावाच्या परिसरात निर्माण करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे.
ग्रामीण भागात चांगले बळ
जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांसाठी सिंचनाचे प्रकल्प मुख्यतः डीएलबीसी व केएलबीसी साठी महायुती सरकार अर्थसंकल्पातून निधी देणार आहे. देण्यात येणारा निधी आरक्षित ठेवला जाणारा असून 35 वर्ष जुन्या कालव्यांना त्याची मदत होणार आहे. पिंपळगाव जोगा 70 किमी. लांबीचा कालवा आहे. त्यातील 52 किमी. लांबीच्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम करण्यात आले आहे. उर्वरित 20 किमी. साठी निधी मिळाला आहे.