कोलकाता – ओडिशातील बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी खळबळजनक दावा केला आहे. या अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे तर अधिकारी यांचे मानसिक संतुलन ढळले असल्याचे प्रत्युत्तर तृणमूल कॉंग्रेसने दिले आहे.
काय म्हणाले सुवेंदु अधिकारी….
या लोकांनी (तृणमूल कॉंग्रेस) पोलिसांच्या मदतीने दोन्ही रेल्वेंच्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले आणि त्यांच्यातील संवाद ट्वीटरवर टाकला. अधिकाऱ्यांमध्ये काय बोलणे झाले हे यांना कसे कळले? यामागे काय कारस्थान आहे? हा तृणमूल कॉंग्रेसचाच कट आहे.
संभाषण लिक कसे झाले हे सीबीआयच्या तपासात आले पाहिजे. तसे जर ते आले नाही तर आपण कोर्टाचे दार ठोठावू. या अपघातावर राजकारण व्हायला नको आणि देशाला बदनाम करायला नको. भारताच्या कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्री असे करत नाहीत.
तृणमूलचे प्रत्युत्तर…
सुवेंदु अधिकारी यांच्या आरोपांना तृणमूल कॉंग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या की दुर्घटनेत काही जणांनी आपले हात पाय गमावले आहेत. मात्र आमच्यावरच आरोप करणाऱ्यांचा मानसिक तोल सुटला आहे.
जखमी झालेल्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला विशेष होमगार्डची नौकरी देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. ही वाद घालण्याची वेळ नाही. या प्रकरणातील तथ्ये लवकरात लवकर समोर आली पाहिजेत.