कराड – सध्या पुणे-बेंगलोर महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून या कामादरम्यान जवळपास 7 हजार वटवृक्ष तोडण्यात आले आहेत. परंतु, या झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे असून वाहगाव ता. कराड येथे यातील काही झाडांचे आपण पुनर्रोपण करणार असल्याची माहिती प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली.
महामार्गावरून प्रवासात करताना मंगळवार दि. 14 रोजी त्यांनी महामार्गावरील विस्तारीकरणामध्ये तोडण्यात आलेल्या झाडांची पाहणी केली. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांचे सहकारी व महामार्ग कामावरील कर्मचारी उपस्थित होते.
अभिनेते शिंदे म्हणाले, सध्या महामार्गालगत असलेले वटवृक्ष हे जवळपास 200 वर्षांपूर्वीचे असून महामार्ग विस्तारीकरणामध्ये ही झाडे तोडली जात आहेत. या झाडांच्या ऐवजी दोन-चार झाडे लावण्यात येतील. परंतु, त्यांचे जतन करण्यामध्ये सातत्याने राहत नाही. त्यामुळे महामार्ग विस्तारीकरणात निघणाऱ्या बहुतांशी झाडांचे पुनर्रोपण करणे गरजेचे आहे.
एका वडाच्या झाडावर जवळपास 500 प्रकारच्या प्रजाती जगत असतात. तसेच मधमाशांचे मोहोळही याच झाडांवर जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. हीच झाडे तोडल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जीवांचे काय? असा प्रश्न उपस्थित करत यातील बहुतांशी झाडे वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महामार्गावरील वृक्षतोडीची पाहणी करताना एका झाडावर असलेल्या मधमाशांच्या मोहोळाने उपस्थितांवर हल्ला केला. यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनाही दोन-चार मधमाशांनी डंक मारला. परंतु, मधमाशांच्या हल्ल्यात मानेवर किरकोळ सूज आली असून आपण अगदी सुखरूप असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.