नवी दिल्ली – पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी आसाममधील युनायटेड लिबरेशन फ्रंट (उल्फा) सोबत केंद्राच्या चर्चेवर सरकारला धारेवर धरले आहे. एकीकडे केंद्र सरकार ईशान्येकडील दहशतवाद्यांशी चर्चा करत आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे त्यांचे वडील आणि पीडीपी संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांच्या मेळाव्याला त्या संबोधित करत होत्या.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, आम्ही शरणागती पत्करणार नाही. जर तुम्ही (केंद्र) आमच्याशी सन्मानाने बोललात, तर आम्ही आदराने उत्तर देऊ. तुम्ही बाफलियाजमध्ये जसे लाठ्या मारल्यासारखे बोललात, तर हे चालणार नाही. केंद्र ईशान्येतील दहशतवाद्यांशी वाटाघाटी करत असताना, जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना दहशतवादी ठरवले होते.
मुफ्ती म्हणाल्या की, तिथे (ईशान्येत) तुम्ही (केंद्र सरकार) दहशतवाद्यांशी बोलत आहात, तर जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही सामान्य लोकांना दहशतवादी घोषित केले आहे. तुम्ही (अंदाधुंद) अटक करून तुरुंग भरले आहेत. वेळोवेळी ईडी, एनआयए, एसआयए छापे टाकतात. कोणी स्वतःच्या लोकांशी असे कसे वागू शकतो, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.