अवकाळी पावसाचा बसला फटका : मधमाश्या पडल्या मृत
पुणे – अवकाळी पावसाचा परिणाम शेती व्यवसायाबरोबरच मधुमक्षिका पालन व्यवसायावर झाला आहे. राज्यातील मधुमक्षिका पालन व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जोरदार पावसामुळे मधमाश्या मृत झाल्याने हा व्यवसायच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यावर त्वरित उपाययोजना करून व्यवसायास बळ द्यावे, अशी मागणी मध उत्पादकांकडून होत आहे.
राज्यात शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. यावर्षी पाऊस लांबला तर परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सततच्या पावसामुळे वसाहतीतील मधमाश्या मृत झाल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मधुमक्षिका पालन व्यवसाय करणारे व्यावसायिक मधाच्या पेट्या जंगल हद्द व शेजारील मोठ्या फळांच्या झाडांना लावून ठेवतात. या व्यवसायास महत्त्वपूर्ण असलेली राणीमाशी अन्य मधमाश्यांच्या सहाय्याने या पेट्यांमध्ये मध संकलित करतात. पण पावसामुळे सध्या या पेटीमधील मधमाश्या मृत झाल्याचे आढळून येत असून या माशा मृत झाल्याने यावर्षी मध जमा करणे अडचणीचे ठरणार आहे. राज्यातील मध संकलनावर याचा परिणाम होणार असून औषधी मधाचा यावर्षी तुटवडा जाणवणार आहे. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. तर हा व्यवसायच कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अवकाळी पावसामुळे मधमाश्यांना अन्न गोळा करण्यासाठी त्यांच्या पोळ्यातून बाहेर पडणेच शक्यच झाले नाही. मध आणि परागकणांची आवक थांबली, मधमाश्यांनी मे महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमा करून ठेवलेला मधाचा साठा पावसाळ्यातच संपला. नवीन जन्माला आलेल्या माश्यांना आणि पोळ्यांतील लहान पिलांना खाद्य कमी पडले. उपासमारीमुळे आधी पिलावळी नंतर शिशू अवस्थेतील माश्या मृत पावल्या. त्यानंतर प्रौढ माशा पण मरण पावल्या. जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त मधुमक्षिका वसाहतीत नाश पावल्या आहेत.
माश्यांना जाणवला अन्नाचा तुटवडा
मधमाश्यांच्या पेट्यांमध्ये शिल्लक असलेल्या माश्यांना साखरेच्या पाकाचे कृत्रिम खाद्य देऊन वाचवण्याचा काहींनी प्रयत्न केला आहे. मात्र, अवकाळी पावसाचा मुक्कम लांबल्याने मधमाशी व तिच्या कुटुंबाला उपजीविकेसाठी अन्नाचा तुटवडा निर्माण झाल्याने मधमाश्यांवर मृत्यू ओढवला आहे.