मुंबई :- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नागरी सेवा मंडळाच्या शिफारसीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने केलेल्या आहेत. ही प्रक्रिया कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन करून पारदर्शक पद्धतीने पार पाडली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अशोक ऊर्फ भाई जगताप यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री देसाई म्हणाले, विभागात 254 मंजूर पदे असून त्यातील 201 पदे कार्यरत आहेत. यापैकी 61 पदे यावर्षी बदलीस पात्र होती. प्रत्यक्षात 52 पदांच्या बदल्या केलेल्या असून त्यापैकी 42 अधिकाऱ्यांच्या बदल्या पसंतीक्रमानुसार, 14 बदल्या विनंतीनुसार तर 10 बदल्या प्रशासकीय कारणास्तव केलेल्या आहेत.
या बदल्यांमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही. तथापि ठराविक अधिकाऱ्यांविषयी तक्रार असल्यास त्यांची प्रकरणे तपासून त्याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.