मुंबई : हिंगोलीच्या रामलीला मैदानावर शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्टला सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांनी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे नाव न घेता त्यांना ‘गद्दार दादुल्या’ म्हणत सडकून टीका केली आहे.
अयोध्या पोळ यांनी एक ट्विट केले असून त्यातून त्यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. यात त्यांनी,“कळमनुरी विधानसभेचा गद्दार व त्याचे चेलेचपाटे त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडीओ मला पाठवत आहेत. गद्दारांसह सर्व चिरकुटांना मी सांगू इच्छिते की, मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे. कारण जो बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रँड आहे. त्यांना मार्केटिंग व बॅनरबाजीची गरच नाही हे लक्षात ठेवा.” असे म्हटले आहे.
कळमनुरी विधानसभेचा #गद्दार व त्याचे चेलेचपाटे मला त्यांनी लावलेल्या बॅनर्सचे व्हिडिओ पाठवत आहेत तर गद्दार सहीत सर्व चिरकुटांना सांगू इच्छिते की मार्केटिंग व बॅनरबाजीची गरज तुम्हालाच आहे कारण जो #बापमाणूस हिंगोलीत येतोय तो तळपता सुर्य आहे, एक ब्रॅंड आहे ज्याला मार्केटिंग व…
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) August 24, 2023
पुढे बोलताना त्यांनी,“उद्धव ठाकरे या २४ कॅरेट अस्सल ब्रँडचं मार्केट डाऊन करण्यासाठी स्वयंघोषित जागतिक स्तराची महाशक्ती अपयशी ठरतेय. तिथं तु तुझी अगरबत्ती कुठे लावतो गद्दार दादुड्या? हिंगोलीत स्वयंघोषित महाशक्तीचा बाप येतोय बाप,” असे म्हणत अयोध्या पोळ यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.
दरम्यान, याआधीही अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांना त्यांच्याच एका आव्हानाची आठवण करत “मिशा कधी काढणार?” असा खोचक सवाल केला होता. संतोष बांगर यांनी अयोध्या पौळ यांना जाहीर आव्हान दिलं होतं. अयोध्या पौळ यांनी संजय बांगर यांचा उल्लेख गद्दार असा केल्यानंतर त्यांनी टीका करताना आव्हान दिले होते.