पुणे – सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरखपूर, लखनौ, जयपूर आदी शहरांसाठी पुण्यातून सुटणाऱ्या गाड्या “फुल्ल’ झाल्या आहेत. याशिवाय, इंटरसिटी एक्स्प्रेस सुसाट धावत आहेत. मात्र, नागपूर, हबीबगंज या भागांत धावणाऱ्या गाड्यांना तुलनेने कमी प्रतिसाद आहे.
रेल्वेच्या मागील वर्षी स्थगित केलेल्या नियमित प्रवासी गाड्या अद्यापही रुळावर आल्या नाहीत. यादरम्यान रेल्वेकडून उत्सव विशेष, विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. या गाड्यांसाठी आरक्षण करणे बंधनकारक आहे. दररोज पुण्यातून सुमारे 200 गाड्या सुटायच्या. मात्र आता करोनामुळे गाड्यांची संख्या कमी केली आहे. आगामी होळी आणि करोनाच्या प्रादुर्भावाचा रेल्वे गाड्यांवर परिणाम होत आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्याहून उत्तरेकडे सुटणाऱ्या गाड्या “हाऊसफुल्ल’ होत आहेत. मागील आठवडाभरापासून पुणे-जम्मूतावी, पुणे-हावडा, पुणे-दानापूर, पुणे-गोरखपूर, पुणे-दरभंगा, पुणे-लखनौ, पुणे-जबलपूर, पुणे-हटीया, पुणे-जयपूर या गाड्यांचे आरक्षण 100 टक्के पूर्ण झाले आहेत.
तर इंटरसिटी गाड्यांपैकी डेक्कन क्वीन, महाराष्ट्र एक्स्प्रेस, सोलापूर एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या गाड्यांच्या आरक्षणाला प्रतिसाद मिळत आहे. तर, हबीबगंज, नागपूर, अजनीकडे जाणाऱ्या गाड्यांना तुलनेने कमी प्रतिसाद आहे.