विजया रहाटकर; समित्यांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नाराजी
सातारा – महिलांचे कायदे, सुरक्षिततेबाबत तब्बल 45 हजार लोकांना प्रशिक्षण देणारा एकमेव राज्य महिला आयोग आहे. इतके प्रयत्न करूनही माणसांची मानसिकता सकारात्मक नाही. समित्यांवर नेमले तर उगाच काम लागते, असे त्यांना वाटते. इतके प्रयत्न करूनही समाधानकारक उत्तर मिळत नाहीत, हे दुर्दैव आहे, अशी खंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रोहिणी ढवळे, ऍड. मनीषा बर्गे यावेळी उपस्थित होते. येथील बालनिरीक्षण गृहामध्ये त्यांनी महिलांसाठी जनसुनावणी घेतली. यामध्ये सुमारे 35 खटले दाखल झाले होते. त्यामुळे अनेक तक्रारींचा निपटारा झाला, तसेच दोन दाम्पत्यातील वाद मिटविण्यात आले. रहाटकर म्हणाल्या, “”महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला आयोग जिल्हा स्तरावर प्रथमच जनसुनावणी घेत आहे.
मुंबईपर्यंत सर्वच महिलांना येणे शक्य नसते. म्हणून “महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यभर राबविला आहे. कौटुंबिक वाद, लैंगिक छळ, पोक्सो, सोशल मिडियाचा गैरवापर आदी प्रकारचे खटले यामध्ये येतात. या सुनावणीत वाद मिटल्यानंतर तीन, सहा महिन्यांनंतर त्यांचा पाठपुरावा केला जातो. या सुनावणीत तत्काळ प्रकरणे निकालात निघावी, यासाठी संबंधित प्रशासनाला उपस्थितीत ठेवले जाते.”
महिलांवर अत्याचार होण्याबाबत अहमदनगर जिल्हा सर्वाधिक संवेदनशील आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व संस्थांमध्ये अंतर्गत समिती (पूर्वीची विशाखा समिती) स्थापन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. शाळांमध्ये होणाऱ्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत संबंधित संस्थाचालक, शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कारवाई होण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
“त्या’ संघटनांवर गुन्हे दाखल करा
शासनाच्या मान्यताप्राप्त संस्था नसतानाही महिलांचे तंटे मिटवतो, न्याय मिळवून देतो, असे सांगून लोकांची दिशाभूल करण्याचे काम कोणत्या संघटना करत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विजया रहाटकर यांनी दिले.