शिराळा तालुक्यात परिस्थिती; अपुरे आश्रयस्थळ
शिराळा – शिराळा तालुक्यात 16 वर्षांत नऊ बिबट्यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी उद्यानात दोन तर उद्यानाबाहेर सात बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. परिसरातील बिबट्यांच्या मुक्त संचार हा शेतकऱ्यांना शेतात जाताना धडकी भरवणारा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा वावर कायमचाच आहे. त्यातील काही बिबटे अन्नाच्या शोधत बाहेर पडले ते बाहेच राहिले आहेत. ते बाहेर पडल्याने त्यांच्या बछड्यांचा जन्म शेतात व डोंगर कपारीत झाला. त्यांना जंगल माहित नसल्याने उद्यानाबाहेरील परिसर हेच त्यांचे आश्रयस्थळ बनू लागले आहे.
त्यामुळे त्यांचा वावर हा चांदोली राष्ट्रीय उद्यानापासून 60 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. अन्नाच्या शोधत फिरले असताना पाळीव प्राण्यांना आपले भक्ष्य बनवले जात आहे. शिराळा तालुका डोंगरी असल्याने बिबट्याला राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. परंतु, काही वेळा त्यांना पुरेसे अन्न मिळत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला. त्यामुळे मांगरुळ, बिळाशी, वाकुर्डे, येळपूर, कुसाईवाडी, मांगले, मिरखेवाडी, बेरडेवाडी आदी परिसरातील पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारले आहे. अजूनही पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरुच आहेत. लादेवाडी येथे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू हा हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात झालो.
मे महिन्यात शेडगेवाडी- खुजगाव दरम्यान असलेल्या वारणा जलसेतुवरून पडून बिबट्याचा मृत्यू झाला होता. 14 सप्टेंबर 2004 रोजी खेड तालुक्यातील आयनीमेटा येथून चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी आणलेल्या नर जातीच्या बिबट्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यापूर्वी चव्हाणवाडी येथील जंगलात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.
2016 ला वाकाईवाडी येथे विषबाधा झाल्याने दोन तर वाकुर्डे खुर्द येथील सवादकरवाडी येथील शेतात अन्न साखळी तुटल्याने एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. एक जानेवारी 2015 रोजी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत धुमाकूळ घातलेला बिबट्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यासाठी नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. त्यामुळे 16 वर्षात शिराळा तालुक्यात नऊ बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडलेले बिबटे पुन्हा उद्यानकडे न फिरवल्याने उद्यानाबाहेरील परिसर हेच त्यांचे आश्रयस्थळ बनले आहे. त्यामुळे त्यांना होणारी बछडी परिसरात असणारे ऊस, छोटी- छोटी जंगले हेच आपले आश्रयस्थळ मानत आहेत. परंतु, हे आश्रयस्थळ पुरेसे नसल्याने ते नवीन आश्रयस्थळ व अन्नाच्या शोधात भटकत आहेत. त्यामुळे विविध भागांत बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्या दिसला तर काय करावे व हे का घडते, याबाबत आम्ही गावोगावी प्रबोधन करून लोकांच्या मनात असणारी बिबट्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
एस. आर. काळे, वनक्षेत्रपाल, शिराळा.