अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ
चिंबळी – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आळंदी फाटा ते मोशीटोल नाक्यापर्यंत ठिकाणच्या वाहतूक कोंडीने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील वाहतूक कोडींला व अपघाताला आळा घालण्यासाठी कुरुळी, चिंबळी, मोई या तिन्ही फाट्यांवर झेब्राक्रॉसिंग व सिग्नल बसविण्याची जोरदार मागणी या परिसरातील नागरिक व प्रवाशांनी केली आहे.
चाकण परिसरात आळंदी फाटा, खराबवाडी, महाळुंगे इंगळे, निघोजे, कुरुळी, चिंबळी, सोळू, धानोरे, मरकळ आदी परिसरात औद्योगिक क्षेत्रामुळे कंपन्या व गोदामे उभी राहिल्याने पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते भोसरीपर्यंत जडमालवाहू व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे चाकण, आळंदीफाटा, कुरुळी, मोई, चिंबळी फाटा, निघोजे, मोशी टोलनाक्या पर्यंत जडमालवाहू व अवैध प्रवासी वाहतूक वाहनांची कोंडी व महामार्गावर छोटे-मोठे अपघातही नित्याचेच झाले आहेत. अपघात टाळण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा साईडपट्ट्या रूंद कराव्यात व कुरुळी, मोई, चिंबळी फाटा येथे सिग्नल यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरीत आहे.