पुणे, दि. 16 -दिवाळीपूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे नागरिकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
दिवाळी सण काही दिवसांवर आला आहे. या सणांच्या खरेदीसाठी शेवटचा रविवार असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, मंडई परिसर, तुळशीबाग, बाजीराव रस्ता, बोहरी आळी या परिसरात गर्दी केली होती. शनिवारी झालेल्या वाहतूक कोंडीचा अनुभव पाहता पोलिसांकडून महत्वाच्या चौकात दोन पोलिसांची नेमणूक केली होती; पण नागरिकांच्या गर्दीपुढे वाहतूक पोलिसांची संख्या अपुरी पडत होती.
नागरिक खरेदीसाठी वाहने घेऊन मध्यवर्ती पेठांमध्ये आल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अप्पा बळवंत चौक, शिवाजी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक चौक ओलांडण्यासाठी वाहनांना वीस ते तीस मिनिटे लागत होती.
खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता धरून वाहतूक पोलिसांनी नियोजन केलेले दिसले नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पदपथावर अतिक्रमण
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले असून, नागरिकांना चालण्यासाठी जागा ठेवली नाही. रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि पदपथावर पथारीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे नागरिकांनी चालायचे कुठून, असा सवाल पादचारी करीत होते.
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
बरेच नागरिक खरेदीसाठी खासगी गाड्यांमध्ये आले होते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गाड्यांची संख्या इतकी होती, की सर्वच ठिकाणचे सार्वजनिक पार्किंग फूल झाले होते. तर खासगी पार्किंग देखील फूल असल्याने नागरिकांनी शेवटी रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्किंग केल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडली.
सायंकाळनंतर पोलिसांना उपरती
रविवारी दिवसभर नागरिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असताना वाहतूक पोलिसांनी सायंकाळी सहा वाजल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून शिवाजी रस्त्याकडे दुचाकी सोडून इतर वाहने सोडण्यास बंदी केली; पण या मार्गावरील मोठ्या वाहनांना बंदी घातल्यामुळे इतर मार्गांवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. इतर सर्व मार्गांवर रात्री उशीरपर्यंत वाहतूक कोंडी होती.
वाहतूक पोलिसांचे ढिसाळ नियोजन
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असताना महत्वाच्या चौकामंध्ये वाहतूक नियमांसाठी वाहतूक पोलीस दिसलेच नाहीत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालक वाहतूकीचे नियम पाळत नव्हते. शहरातील सर्वच सिग्नल सुरू असले तरी त्याचा वापर होताना दिसला नाही. दिवाळीनिमित्त शनिवारी शहरात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी रविवारी वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक होत;े पण असे कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
पीएमपीच्या 180 फेऱ्या रद्द
पुणे -वाहतूक कोंडीचा परिणाम सलग दुसऱ्या दिवशीही पीएमपीच्या बस फेऱ्यांवर झाला. रविवारी पीएमपीच्या 180 हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. शनिवारी 140 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द झाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
शनिवारी पीएमपीच्या 1660 बसचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील 1598 बस मार्गावर धावत होत्या. प्रशासनाने 1660 बससाठी 22895 फेऱ्यांचे नियोजन केले होते, पण प्रत्यक्षात 1598 बसच्या माध्यमातून 19019 फेऱ्याच झाल्या होत्या. सायंकाळी ऐन ऑफिस सुटायच्या वेळेस लांब पल्ल्याच्या मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. नागरिकांना एक ते दीड तास बससाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
वाहतूक कोंडीमुळे आगारात बस उशिरा आल्यामुळे पुढील वेळापत्रक कोलमडते. पण आम्ही जास्तीत जास्त बस लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत देण्याचा प्रयत्न करतो, असे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रये झेंडे यांनी सांगितले.