ब्रिस्बेन – ऑस्ट्रेलियात रविवारपासून सुरु झालेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. यातील पहिला सराव सामना आज(सोमवार) यजमान ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ( Practice match between India and Australia in the T20 World Cup on Monday) या सामन्यात भारताचा नवोदित परंतू भरात असलेला आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे.
क्लब दर्जाच्या संघाविरुद्ध झालेल्या दोन सराव सामन्यात भारताने एक विजय व एक पराभव प्राप्त केला. आता मुळ स्पर्धेत खेळत असलेल्या ऑस्ट्रेलिया व त्यानंतर 19 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी भारतीय संघ सराव सामना खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सर्व प्रमुख खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेला 2007 सालापासून प्रारंभ झाला होता व त्यात पहिल्याच मोसमाचे विजेतेपद भारताने पटकावले होते. मात्र, त्यानंतर तब्बल 15 वर्षे आपल्याला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
सूर्यकुमारची कामगिरी लक्षवेधी ठरेल
संपूर्ण भारतीय संघात सर्वात जास्त अपेक्षा सूर्यकुमार यादववर आहेत. त्यानेच यंदाच्या मोसमात सातत्याने धावा केल्या आहेत. तसेच कोणत्याही देशात, कोणत्याही गोलंदाजीवर व कोणत्याही परिस्थितीत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. आता या सराव सामन्यातही चमक दाखवत आगामी मुख्य स्पर्धेपूर्वी अन्य संघांना धोक्याचा इशारा देण्यासाठी तो सज्ज आहे.
यंदा भारतीय संघाला नुकत्याच पार पडलेल्या आशिया करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात अपयश आले होते. ही कसर शनिवारी भारताच्या महिला संघाने भरून काढताना महिलांची आशिया करंडक स्पर्धा जिंकली. आता त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत भारताच्या पुरुष संघाला या स्पर्धेत सरस खेळ करावा लागणार आहे.
T20 World Cup | टी-२० वर्ल्डकपच्या इतिहासात फक्त विराट कोहलीच्याच नावावर ‘हा’ भीमपराक्रम…
भारतीय संघाचा समतोल पाहिला तर अद्याप काही प्रश्न सुटलेले नाहीत. सलामीला कर्णधार रोहित शर्मा व लोकेश राहुल यांना अद्याप सातत्य राखता आलेले नाही. तसेच विराट कोहली भरात आला असला तरीही त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होताना दिसलेल्या नाहीत. त्यामुळे दीपक हुडा, दीनेश कार्तिक व ऋषभ पंत हे कशी कामगिरी करतात यावरच स्पर्धेतील यश अवलंबून राहणार आहे.