वाई – येथील औद्योगिक वसाहतीत विविध कंपन्यांमध्ये काम करणारे परप्रांतीय 200 कामगार लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. दरम्यान, मुंबई वांद्रे येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर वाई औद्योगिक वसाहतीत अडकून पडलेल्या परप्रांतीय कामगारांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले.
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोपर्डी, सुलतानपूर व वाई एमआयडीची येथे राहणारे सुमारे 200 उत्तर भारतीय परप्रांतीय कामगार औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये काम करीत असून कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या, तसेच मुंबई वांद्रे घटनेचे पार्श्वभूमीवर त्यांना कोणत्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच कोणालाही काही मेडिकल इमर्जन्सी असल्यास त्वरित वाई पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले व कोणाकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्व कामगारांना योग्य सूचना करण्यात आल्या.
यावेळी काही परप्रांतीय कामगारांच्या पगाराबाबत काही कंपनीच्या अडचणी होत्या, त्या कंपनीच्या व्यवस्थापकांशी संवाद साधून त्यांच्या होत असलेल्या अडचणी दूर करण्यात आल्या, तसेच त्यांना रेशन व जीवनावश्यक वस्तू पुरवणेबाबत व त्यांना शासकीय यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस नाईक प्रशांत शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल बापूराव मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.