पुणे – पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आणि बंगळुरूला जोडणारा पुणे-सातारा महामार्ग महत्वपूर्ण आहे. या महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी 2010 मध्ये तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला. पण, 2013 नंतर आता 10 वर्षे उलटूनही या महामार्गाचे काम अपूर्णच आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी रिलायन्स इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला तब्बल सहा वेळा मुदतवाढ देऊनही हे काम अपूर्ण असल्याची स्थिती आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणते…
पुणे – सातारा महामार्ग कामाचा प्रकल्प अहवाल 2007-08 मध्ये तयार झाला. त्यानंतर 2010मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. शासनाकडून सदर काम सुरू होण्यापूर्वी ठेकेदार कंपनीस जमीन संपादित करून देणे आवश्यक होते. मात्र, शासनाकडून जमीन संपादित करून देण्यास उशीर झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडूनही कामांमध्ये अडथळा आणून काम बंद करण्याच्या घटना घडल्या. सेवा रस्ता करण्यासाठी भूसंपादनाचे मुद्दे होते. ठेकेदार कंपनीनेही कामांमध्ये दिरंगाई केली. मात्र, सद्यस्थितीला जवळजवळ 98 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसातच अपूर्ण कामेही पूर्ण केली जातील, असा विश्वास महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महामार्गाचे सहा पदरीकरण तसेच सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण असतानाही टोल मात्र सहा पदरी रस्त्याचा घेतला जात आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून रोष व्यक्त होत आहे. महामार्गावर अपघातात आतापर्यंत शेकडो निरापराधांचे जीव गेले. अनेकजण जखमी झाले. पण, या अपघातांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार रिलायन्स इन्फ्रा कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नसल्याची स्थिती आहे.
अपूर्ण कामांची जंत्री
मार्च 2023 संपला, तरी या रस्त्याचे काम अर्धवट
अनेक ठिकाणी सेवा रस्त्याची कामे रखडली.
शिवरे, वरवे या भागांत सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण
शिंदेवाडी ते सारोळादरम्यान अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइनची कामे
झालेली नाहीत.
खेड शिवापूर, शिवरे आणि
हरिश्चंद्री येथील प्रस्तावित उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या कामाला सुरुवातही झालेली नाही.
सेवा रस्त्यावर स्वच्छतागृहे,
बऱ्याच ठिकाणी पथदिवेच नाहीत
टोलनाके सुरूच, वसुलीही जोमात
महामार्ग कामाची सुरुवात झाली, तेव्हा खंबाटकी आणि खेडशिवापूर हे दोन टोलनाके सुरू करण्यात आले. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी खंबाटकी टोलनाका हटवण्यात आला. पण, आता खेडशिवापूर टोलनाका सुरूच ठेवण्यात आला. तर, आणेवाडी येथे नवा टोलनाका सुरू करण्यात आला. तेथूनही आता वसुली सुरू ठेवण्यात आली आहे. त्याची मुदत किती, वसुली किती? याबाबत कोणाचेही लक्ष नसल्याची स्थिती आहे.
महामार्ग बांधणीवर दृष्टिक्षेप…
पुणे-सातारा अंतर : 140 किलोमीटर
सहा पदरी रस्त्याचे काम : 2010 मध्ये सुरुवात
काम पूर्णत्वासाठी सुरुवातीला : 3 वर्षांची मुदत
बांधा, वापरा व हस्तांतरित करा : तत्त्वावर करार
काम पूर्ण करण्याचे निश्चित : मार्च 2013
त्यानंतर वारंवार तब्बल मुदतवाढ : 6 वेळा