पुणे – उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असतानाच यंदा कमी पाऊसमान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील पाणी काटकसरीने वापरण्यात येणार आहे. हे पाहता, महापालिकेने मागील महिन्यापासूनच घरगुती तसेच व्यावसायिक वापरासह सर्व नवीन नळजोड देणे बंद केले आहे.
ही माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत हा निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. सोबतच वाहनांचे वॉशिंग सेंटर, बांधकामांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी वापरण्यात येत आहे का, याची तपासणीही प्रत्यक्ष जाऊन केली जाणार आहे. कमी पावसाचा अंदाज असल्याने महापालिकेने आपत्कालीन पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास शासनाने सांगितले आहे. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आदेश मार्चमध्येच दिले. त्यासाठी पालिकेने आराखडा सादर केला आहे.
शिवाय, शहरात प्रत्यक्षात पाणी बचतीस सुरूवात केली आहे. त्याचा एक भाग म्हणून 15 मार्चपासूनच नवीन नळजोड देणे बंद करण्यात आले असून त्यात सर्व प्रकारच्या नळजोडांचा समावेश असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.
गळती शोधण्यावर भर
पाण्याची बचत करण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांची गळती शोधण्यात येत आहे. त्यासाठी ध्वनीलहरींचा वापर करून गळती शोधणारी यंत्रणा वापरण्यात येत असून वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर जवळपास 13 ठिकाणी गळती सापडली आहे. ती दूर करण्यासह इतर मुख्य जलवाहिन्यांची गळती शोधून ती कमी करण्यावर पालिका प्रशासन भर देत आहे.