हिंगोली – मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी सावंत, हापसापूर, टेंभुर्णी, विरेगाव, आरळ, बळेगाव या गावांसह इतर गावांनासुद्धा पावसाचा फटका बसला आहे.
अगोदरच पावसाळा एक महिना उशिराने सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात पावसाचा लहरीपणामुळे शेतातील उभी पिकं करपून जात असताना ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे शेंगा लागलेले सोयाबीन, बोंड लागलेले कापूस, तोडणीस आलेला ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे जमीनदोस्त झालेली आहेत. वसमत तालुक्यात झालेला पाऊस इतका मोठ्या प्रमाणात आला की, आजही अनेक ठिकाणच्या शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेला आहे.
यातील अनेक पिकं अगदी काही दिवसांच्या काढणीवर आले होती. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून, सरकारने मदतीची घोषणा करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांना विमा मंजूर करून नुकसानभरपाई देण्याची सुद्धा मागणी होत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे औंढा तालुक्यातील सिद्धेश्वर धरणामध्ये देखील पाण्याची वाढ होतांना पाहायला मिळत आहे. सिद्धेश्वर धरणात 2.728 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत धरणामध्ये 72.10 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. धरणाच्या वरच्या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून अधून-मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.