वर्षभरात काम सुरू करणार : पक्षनेत्यांचे महासभेत आश्वासन
पिंपरी – राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह मावळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असला तरी पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी जलवाहिनी गरज महासभेत बोलून दाखविली. त्यावर बोलताना वर्षभरात जलवाहिनीचे काम सुरू करण्याचे आश्वासन सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले. त्यामुळे पवना जलवाहिनीचे काम सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून मावळ भाजपच्या भूमिकेकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवडवासियांना वर्षभरापासून पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. दिवसाआड पाणी कपात रद्द करून आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू केल्यानंतर महापालिकेचे पाणी पुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यावरुन महासभेत चर्चा सुरू असताना सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी पवना बंद जलवाहिनीची शहरासाठी गरज व्यक्त केली.
पवना बंद जलवाहिनी प्रकल्प हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळातील महत्वाकांक्षी प्रकल्प होता. पवना धरणातून थेट पाणी रावेत बंधाऱ्यापर्यंत आणण्याची ही योजना होती. मात्र, मावळातील सत्ताधारी भाजपकडून या योजनेला विरोध झाला. याविरोधातील आंदोलनात तीन शेतकऱ्यांचे बळी गेले. त्यामुळे हा प्रश्न अधिकच चिघळला.
मावळवासियांचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे. त्यामुळे ही योजना रखडली आहे. मात्र, पवनातून पाणी उचलण्याची मर्यादा आणि शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याची वाढती मागणी यामुळे जलवाहिनीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पवना धरण हा एकमेव पाणी पुरवठ्याचा स्त्रोत पिंपरी-चिंचवडकरांना उपलब्ध आहे. आंद्रा व भामा आसखेडमधून पाणी आणण्याचे नियोजन आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे पवना बंद जलवाहिनी मार्गी लावावी, अशी अपेक्षा सत्ताधारी भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही केली.
“पवना’ची उंची एक मीटरने वाढणार
शहराच्या वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी पवना धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात येणार आहे. या कामाचा खर्चही महापालिकेने राज्य सरकारकडे जमा केला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महासभेत दिली. धरणाची उंची वाढविल्याने पिंपरी- चिंचवडकरांना एक टीएमसीने पाणीपुरवठा वाढणार आहे.
धरणाची उंची वाढल्यानंतर धरणाची सध्याची पाणीसाठवण क्षमता 10.76 वरून 11.94 टीएमसी एवढी वाढणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेला पवना धरणातून दर दिवशी दर माणसी 480 दशलक्ष लिटर पाणी पुरविण्यात येते. पिंपरी – चिंचवड शहराला सन 2025 पर्यंत किती पाणी लागेल, याचा आराखडा करण्यात आला आहे. त्यानुसार, पवना धरणातून पिंपरीला 550 दशलक्ष लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे.
मावळवासियांच्या हातापाया पडू
पवना जलवाहिनी प्रकल्पावर बोलताना सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, पवना धरणातून महापालिका 480 एमएलडी पाणी दररोज उचलते. हा कोटा मागील अनेक वर्षे कायम आहे. मात्र, दुसरीकडे लोकसंख्येत वाढ होत असली तरी पवना धरणातून पाणी उपसण्याची मर्यादा आजही कायम आहे. जादा पाणी मिळविण्यासाठी उपाययोजना गरजेची असून वर्षभराच्या आत पवना बंद जलवाहिनीचे काम सुरु करू, असे पवार यांनी सभागृहात सांगितले. वेळप्रसंगी मावळवासियांच्या हातापाया पडू, असेही ते म्हणाले.
विधानसभा अन् जलवाहिनीचे राजकारण
पवना बंद जलवाहिनीला विरोध हा मावळवासियांच्या अस्मितेचा मुद्दा आहे. मागील पाच वर्षे त्याभोवतीच येथील राजकारण फिरत आहे. प्रकल्प होऊच देणार नाही, अशी भूमिका मावळवासियांसह जिल्ह्याचे सहपालकमंत्री बाळा भेगडे यांची आहे.
मात्र, पिंपरी-चिंचवडकरांसाठी फायदेशीर असलेल्या या प्रकल्पासाठी भाजपचे पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी आग्रही आहेत. यापूर्वीही बंद जलवाहिनीवरुन मावळ व पिंपरी-चिंचवड भाजपमधील दुमत स्पष्ट झाले आहे. पक्षनेते एकनाथ पवार यांनी वर्षभरात जलवाहिनीचे काम सुरू करण्याची ग्वाही दिली. परंतु, बाळा भेगडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आगामी विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा पवना जलवाहिनीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.