मुंबई – ठाकरेंना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन. अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार विकले, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. सत्तेच्या खुर्चीपायी, मोहापायी काँग्रेसला मांडीवर घेतले, काँग्रेसला डोक्यावर घेतले. महाराष्ट्रातील करोडो जनतेबरोबर विश्वासघात केला. बेईमानी केली, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टिकेला दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ‘बाळासाहेब भवन’ येथे उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शिंदे पुढे म्हणाले की, निवडणुका एकाबरोबर, संसार एकाबरोबर आणि हनिमून एकाबरोबर असे धंदे करणाऱ्यांना बोलणे शोभत नाही. त्यांच्या अहंकारामुळे हे राज्य मागे गेले, आम्ही राज्याच्या विकासासाठी सरकार पलटवून टाकले. त्यांनी बोलताना आत्मपरिक्षण करावे. त्यांच्यावर ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करावे.
बाळासाहेबांना अभिप्रेत काम एका खुर्चीच्या मोहापायी त्यांनी पूर्णपणे वैचारिक व्यभिचार केला. विचार सोडले. त्याचे काय फळ मिळाले हे आपल्याला माहित आहे. शिवसेना म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम आम्ही करतोय. हिंदुत्त्वाची भूमिका पुढे नेतोय. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचे आहे हा निर्णय दिलेला आहे. यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही, असेही शिंदे म्हणाले.