शिंदे वासुली -चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा दोनमधील भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील चाकण-भांबोली हा दीड ते दोन किमीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम व एमआयडीसी प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. शिंदे वासुली, भांबोली परिसरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून रविवारी (दि. 31 मे) झालेल्या पहिल्याच अवकाळी पावसाने रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याला ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर डांबराचा कुठेच मागमूस दिसून येत नाही. दरम्यान, करोनाचे संकट आले आणि या रस्त्यासारखे बरेच प्रश्न प्रलंबित राहिले. सध्या राज्यशासनाने कोविड आपत्तीबाबत नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यामुळे रखडलेली, लॉकडाऊनमुळे बंद असलेली रस्ते व विविध विकासकामे सुरू झाली आहेत; परंतु पावसाळा तोंडावर आला असताना पुन्हा रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. रविवारी झालेल्या पहिल्याच अवकाळी पावसाने ठिकठिकाणी मोठमोठी तळी साचली आहेत.
आजूबाजूला विविध प्रकारच्या व्यवसायांची दुकाने असून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही उपाययोजना दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्यामध्ये पाणी, पाण्यात खड्डा, त्यामध्ये असलेले दगडगोटे अशा बिकट परिस्थितीतून प्रवास करणे, वाहन चालवणे मोठे जिकिरीचे असून पायी चालणेही अवघड होऊन बसते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम करण्याची जबाबदारी कोणीतरी घ्या व नादुरुस्त रस्त्यामुळे पावसाळ्यात होणारी नागरिकांची अडचण सोडवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
भांबोली हद्दीतील हा रस्ता आजूबाजूच्या दुकानदारांनी साइड गटारे बुजवून एक ते दोन फूट भर टाकून दुकाने वर घेतली असल्याने रस्ता खाली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही व पाणी रस्त्यावरच साचून राहते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधितांवर कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या; परंतु भांबोली ग्रामपंचायतने त्यांच्या पातळीवर उपाययोजना करणार असल्याचे सांगितले होते.
– संतोष पवार, उपअभियंता सार्वजनिक, बांधकाम विभाग, खेड